मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ९ आरोपी अटकेत आहेत. मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करुन या प्रकरणी पीआय महाजन, पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करण्याची मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे ह्या मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मस्साजोगला भेट देणार आहेत. त्यापूर्वी ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली होती. रात्री साडेदहा वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीतून ग्रामस्थांनी तपास यंत्रणा, सरकार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. ६८ दिवस होऊनही फरार आरोपी यंत्रणेला सापडत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
मस्साजोगकरांच्या पाच मागण्या
१. हत्येप्रकरणातल्या पहिल्या आठ दिवसांमध्ये पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला. तो तपास पुन्हा व्हावा.२. पीआय महाजन, पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करा.३.सदील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.४. आरोपींना सहकार्य करणाऱ्यांची कसून चौकशी करा५. फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा
या मागण्या मान्य न झाल्यास गावामध्येच अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ स्वरुपानंद देशमुख यांनी गावकऱ्यांच्या वतीने प्रतिक्रिया देताना दिला आहे. २५ तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, बैठकीमध्ये बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, घटना घडल्यानंतर पहिल्या आठवड्यात नेमकं काय काय झालं, याची माहिती मिळाली पाहिजे. तपास पुन्हा झाला पाहिजे. सुप्रिया सुळे म्हणतात दिल्लीला गेल्यावर आम्हाला संतोष देशमुख व्यतिरिक्त लोकं काहीच विचारीत नाहीत. त्यांना आम्हाला सगळी माहिती द्यायची आहे.''आरोपींना फाशी होईपर्यंत आपल्याला एकजुटीने लढायचं आहे. कुणामध्ये अजिबात गैरसमज होता कामा नये. थेट माझ्याशी बोला, मी तुमच्यातलाच आहे. एवढं मोठं संकट येईल, असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं. आपल्या गावाने सहनशीलतेने आणि संवेदनशीलपणे पुढे जायचं आहे. गावात कुठेही गालबोट लागेल, असं वागायचं नाहीये.'' असं संबोधन धनंजय यांनी बैठकीत केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.