'सह्याद्री'तील पराभवानंतर रोहिणी खडसेंनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले; 'बॅलेट निवडणुकीत अर्धी मतेही भाजप पॅनेलला मिळाली नाहीत'
कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकहाती जिंकली आहे. पाटील यांचे पॅनेलचे सर्वच सर्व २१ उमेदवार तब्बल सात ते साडेसात हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भाजपला डिवचले आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून भाजपवर निशाणा साधला आहे. आपल्या पोस्टमध्ये खडसे म्हणाल्या, चार महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपरवर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धीही मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील....अशी टीका खडसेंनी केली आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा पी. डी. पाटील पॅनेल, तर भाजप आमदार मनोज घोरपडे-ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेसचे निवास थोरात यांचा तिसरा पॅनेल अशी तिरंगी लढत झाली होती. त्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत २१-० असा विजय मिळविला.
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी मिळविलेल्या विजयाचे कौतुक करताना रोहिणी खडसे यांनी विरोधी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पैशाचा वारेमाप वापर करुनही बॅलेट पेपरवर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणुकीत भाजप पॅनेलच्या उमेदवाराला विजयी उमेदवाराच्या अर्धीही मते घेता आलेली नाहीत, असे म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय पॅनेल उभा करण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काँग्रेसचे निवास थोरात यांच्या मदतीने तिसरा पॅनेल उभा केला होता. त्रिशंकू लढतीत पाटील यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करत विजय मिळविला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.