अनेक वेळा पोलिस खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे दाखल करतात. खऱ्या गुन्हे दाखल करण्यात पोलिस टाळाटाळ करण्यचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केला आहे. बाळ्या मामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना चांगलेच धारेवर
धरून खडसावले. राजकीय दबावापोटी पोलिस खोटे गुन्हे त्वरित दाखल करतात.
मात्र खऱ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पुराव्यांची मागणी करत फिर्यादींना ताटकळत ठेवतात. भिवंडी तालुका पोलिसांची हि वागणूक दुर्दैवी आहे. यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी वेळीच या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर आपण तालुका पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू, असा इशारा यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी दिला आहे.
खार्डी गावातील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर हा तरुण मारेकऱ्यांच्या भीतीने तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी गेला होता. मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी तीन तासाहून अधिक काळ गुन्हा नोंद न करता ताटकळत ठेवले होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळ्या मामा यांना मिळताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. याबाबत पोलिसांनी जाब विचारला.भिवंडी पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करीत आहेत. काही दाखल गुन्ह्यांमध्ये तालुका पोलिस फिर्यादी ऐवजी आरोपींची बाजू उचलून धरत असल्याने अनेक प्रकरणांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. वेळ आल्यास ही प्रकरणे पुराव्यांनिशी आपण समोर आणू शकतो, असा दावा देखील खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.