सातारा : सरकारमध्ये मोठे पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून कुडबुड आणि दहशतीचे राजकारण करणार्यांविरोधात आम्ही बोलणारच. पत्रकार तुषार खरात आणि संबंधित महिलेला न्याय मिळवून देणारच आहे. त्यांनी इशारा त्यांच्या नेत्यांना द्यावा, आम्हाला नको. ना. जयकुमार गोरेंसाठी पोलिसांनी घरगड्यासारखे काम करू नये, असा हल्लाबोल आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
आ. रामराजेंसाठी तुम्ही वकिली करू नये, या ना. गोरे यांच्या टीकेबाबत विचारले असता आ. रोहित पवार म्हणाले, आम्हाला योग्य वाटते ते बोलणारच. पण, जे पदाचा लोकांसाठी वापर करत नाहीत. त्यांना लोकही विचारत नाहीत. पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून राजकारण करतात. पत्रकार तुषार खरात आणि महिला तसेच देशमुख परिवाराचा प्रश्न आहे. देशमुख परिवाराची संस्था गोरेंनी ताब्यात घेतली. कोरोना काळात नफेखोरी झाली, जमीन बळकावली. हे विषय बाहेर येणारच. लोकांना हे सर्व माहीत आहे. पण दहशतीमुळे कोणी बोलत नाही.
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीच्या चर्चांबाबत छेडले असता आ. रोहित पवार म्हणाले, एकत्र येण्याची केवळ चर्चाच सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे आणि दुसरीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार काही संवाद करत नाहीत, तोपर्यंत चर्चाच राहील. दरम्यान, सातारा हा अनेक गोष्टींसाठी सेफ आहे. पण येथील राजकारण काही सेफ नाही. याठिकाणी कधी काही होईल काही सांगता येत नाही. कोणी काहीही करू शकतो, असेही ते म्हणाले.
गुंड बाहेर अन् सर्वसामान्य जेलमध्ये हे बरोबर नाही
मंत्री असल्याने पोलिसही अधिकार असतानाही घरगड्यासारखे काम करत आहेत. वर्दीत राहून चुकीचा प्रकार सुरू आहे. तरीही आम्ही संबंधितांना न्याय देणारच आहोत. गुंड बाहेर अन् सर्वसामान्य माणसे जेलमध्ये हे बरोबर नाही. या प्रकरणात पोलिसांकडूनही दबाव आणण्याचे काम होत आहे. पोलिसांना घेऊन दडपशाही करू नये, अशीही टीका आ. रोहित पवार यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.