इस्लामपूर : खुनीहल्ला, जमावाने मारहाण करणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या येथील मानव गवंडी टोळीला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी हा हद्दपारीचा आदेश दिला. टोळीचा म्होरक्या मानव शंकर गवंडी (वय
24 वर्षे, रा. आंबेडकर नाका, इस्लामपूर), ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे (21
रा. खांबे मळा, इस्लामपूर), विनोद ऊर्फ बाल्या रामचंद्र माने (22, रा. वडार
गल्ली, इस्लामपूर), श्रीयुग ज्ञानदेव ताटे (20, रा. आंबेडकर नाका,
इस्लामपूर), रोशन रमेश रजपूत (20, रा. केएनपी नगर, इस्लामपूर) अशी हद्दपार
केलेल्यांची नावे आहेत. मानव गवंडी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे.
गणेशोत्सव, आगामी सण, उत्सव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या
तोंडावर शांतता, कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात
कारवाईचा बडगा उगारला आहे. मानव गवंडी टोळीविरोधात 2022 ते 2025 या
कालावधीत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस
निरीक्षक संजय हारुगडे यांनी गवंडी टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम
55 अन्वये पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, सहायक पोलिस
निरीक्षक जयदीप कळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांचा सलग दुसरा झटका...
दहा दिवसांपूर्वी इस्लामपुरातील ज्ञानेश पवार टोळीतील 10 जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. पवार टोळीने गवंडी टोळीतील बाल्या माने याचा पाठलाग करून प्राणघातक हल्ला केला होता. दहा दिवसांतच इस्लामपूर पोलिसांनी सलग दुसरी कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.