विधानसभा निवडणुकीला मी २० हजार मतदान बाहेरुन आणलं याचा मला शंभर टक्के फायदा झाला, असा खळबळजनक खुलासा आमदार विलास संदीपान भुमरे यांनी जाहीरित्या व्यासपीठावरुन केला आहे. त्यांच्या या विधानामुळं ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भाषण करताना मध्येच टोकलं. यावेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते.
विलास भुमरे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंनी टोकल्यानंतर मग विलाम भुमरे यांनी स्पष्ट केलं की, माझ्या मतदारसंघातील २० हजार मतदार हे बाहेर स्थलांतरीत झालं होतं, त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो. आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरीत झालेले आहेत, आपण याच्या याद्या केल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यानंतर विलाम भुमरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेनेचे आमदार ठरताहेत वादग्रस्त
दरम्यान, विलाम भुमरेंनी जेव्हा सांगितलं की, मी २० हजार मतदान बाहेरुन आणलं तेव्हा व्यासपीठावरील संदीपान भुमरे, एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट हे तिघेजण हसत होते. पण नंतर हा विषय गंभीर असल्याचं लक्षात येताच एकनाथ शिंदेंनीच विलास भुमरेंना मध्येच थांबवावं लागलं. कारण शिवसेनेच्या एकामागून एक मंत्र्यांकडून आणि आमदारांकडून अशा पद्धतीनं अडचणीत आणणारी विधानं केली जात आहेत.याचा पक्षाला फटका बसत असल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी संजय शिरसाट हे आपल्या मुलाच्या प्रकरणामुळं अडचणीत आले होते, तसंच त्यांचा स्वतःचाच हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगेसह बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे डान्सबार प्रकरणामुळं अडचणीत आले. तर त्यांचे पुत्र आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेला डान्सबार आणि आता सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळं अडचणीत आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.