आंध्र प्रदेशच्या कुरनुलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बसला आग लागून २० जण जिवंत जळाले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ही बस हैदराबादवरुन बंगळुरुला जात होती. या बसला लागलेल्या आगीमागील महत्त्वाचं कारण समोर आलं आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बसला आग लागली तेव्हा बसमध्ये २३४ स्मार्टफोन होते. स्मार्टफोनमधील बॅटऱ्यांचे एकापाठोपाठ एक स्फोट झाले. ४६ लाख रुपयांचे स्मार्टफोन बसमध्ये होते. हैदराबादमधील एक व्यापारी मंगनाथ यांनी पार्सलच्या माध्यमातून २३४ मोबाईल पाठवले होते. बंगळुरुमधील ई कॉमर्स कंपनीसाठी मोबाईल पाठवले जात होते. पण हे मोबाईल बंगळुरुला पोहोचलेच नाहीत. त्याआधीच त्यांचा स्फोट झाला. फोनला आग लागताच बॅटऱ्यांचे स्फोट सुरु झाले. त्या बॅटऱ्यांच्या स्फोटांचे आवाज एकापाठोपाठ एक ऐकू येऊ लागले.
आंध्र प्रदेश अग्निशमन सेवा विभागाचे महासंचालक पी. व्यंकटरमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन सोबतच बसमधील एसीमध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बॅटऱ्यांचाही स्फोट झाला. इंधन गळतीमुळे सुरुवातीला आग लागली होती. एक दुचाकी बसच्या खाली अडकली. त्यातून पेट्रोल गळती सुरु होती. उष्णता किंवा ठिणगीमुळे आग पेटली. पुढच्या काही मिनिटांत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.बसमध्ये करण्यात आलेले सदोष बदलही दुर्घटनेची तीव्रता वाढण्यासाठी कारणीभूत ठरले. लोखंडाच्या जागी हलक्या ऍल्युमिनियमचा वापर करण्यात आला. वाहनाचं वजन कमी करण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी ऍल्युमिनियमचा वापर केला जातो. पण त्याचा वापर आपत्कालीन स्थितीत घातक ठरला. त्यामुळे दुर्घटनेचं गांभीर्य वाढलं. उष्णता इतकी जास्त होती की बसमध्ये वापरण्यात आलेलं ऍल्युमिनियम वितळून गेलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.