महाराष्ट्रात हुंड्यासाठी होणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या रोज समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे नंतर, आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधून आणखी एक हुंडाबळीची घटना घडली आहे. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महाराष्ट्रात आणखी एका नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. इस्लामपूर येथील अमृता गुरव हिने
वारंवार होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केले आहे. आजारी
सासूच्या औषधोपचारासाठी तिच्याकडे वारंवार दोन लाख रुपये आणण्याची मागणी
होत होती. या अमानुष त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी विष प्राशन केले आणि
रविवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अमृता गुरव हिने वर्षभरापूर्वी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ऋषभ याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच तिने मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नानंतर काही महिन्यातच पती ऋषिकेश आणि सासरच्या मंडळींनी आजारी सासूच्या औषध-उपचारांसाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरु केल्याचा आरोप आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.हुंडाबळीच्या या प्रकरणी अमृताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती आणि सासरच्या लोकांसह एकूण पाच जणांवर इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव आणि मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सासरकडून होणाऱ्या या मागणीसाठी तिला वारंवार मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. पती ऋषिकेशकडून शारीरिक मारहाण होत असे, तर सासू अनुपमा आणि नणंद ऋतुजा या दोघी तिचा सतत अपमान करत होत्या. इतकेच नव्हे तर, मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) हा पती ऋषिकेशला 'तू अमृताला सोडून दे, मी तुझं आपल्याच जातीतील मुलीशी लग्न लावून देतो,' असे सांगून अमृताचा मानसिक छळ करत होता. याला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.