महायुतीबाहेरील युतीला रामदास आठवले यांचा स्पष्टपणे नकार; स्थानिक निवडणुकांपूर्वी रिपाइंचा मोठा निर्णय
रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचे आदेश देताना केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट सांगितले की, महायुतीतील घटक पक्षांशिवाय इतर कोणत्याही पक्षाशी युती करू नये.
रिपाइं हा महायुतीचा अधिकृत घटक पक्ष असल्याने निवडणूक तयारीत एकसंध भूमिका ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीसाठी सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांसह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जागा न मिळाल्यास भाजपऐवजी इतर पर्याय
आठवले यांनी पक्षनेत्यांना पुढील रणनीतीही स्पष्ट केली. ज्या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष वेगळे लढणार आहेत, तिथे रिपाइंने युतीसाठी प्रथम भाजपला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. मात्र, भाजपकडून अपेक्षित व समाधानकारक जागा न मिळाल्यास शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा पर्यायी मार्ग खुला ठेवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
स्वबळावर लढण्याची रिपाइंची तयारी
महायुतीसोबत असतानाही, आवश्यक तेवढा सन्मान आणि जागा न मिळाल्यास रिपाइं स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहेत. अनेक पक्षांनी आधीच स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असून, महायुती आणि महाविकास आघाडी घटकांमध्ये तणावपूर्ण स्पर्धा दिसून येते.
सातारा-सांगलीत समीकरणे बदलली
सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मजबूत टक्कर देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची स्थानिक ताकद कमी झाल्याचे NCP च्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे महायुतीसोबत जाणे परिणामकारक ठरणार नाही, असे ठरवून तीन पक्षांनी नगराध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी एकच उमेदवार देण्याचा निर्णय केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.