बापरे! महाराष्ट्रावर धडकणार झोंबणाऱ्या शीत लहरी; ताशी वेग दातखिळी बसवणारा... घरातून बाहेर पडावं की नाही?
उत्तर भारतातील पर्वतीय भागांसह मैदानी क्षेत्रांमध्येसुद्धा तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्या कारणानं मध्य भारत आणि महाराष्ट्रापर्यंत थंडीचा प्रभाव पाहायला मिळत आहे. थंडीचा कडाका सातत्यानं वाढत असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांच्याही खाली उतरला आहे. तर, पुढील 24 तासांसाठी मध्य भारताला थंडीच्या लाटेचा इशारा जारी करत राज्यात ही शीतलहर नेमकी कशा पद्धतीनं तीव्र होत जाईल हेच हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.
महाराष्ट्रातील प्रामुख्यानं उत्तरेकडील पट्ट्यात धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर इथं थंडीच्या लाटेचा इशारा असून, घाटमाथ्यावर शीतलहरी ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वाहणार असल्यानं हा झोंबणारा वारा अडचणी वाढवू शकतो. याशिवाय धुक्याची चादर घाट क्षेत्रासह मैदानी भागांमध्येसुद्धा स्थिरावणार असल्या कारणानं रात्रीच्या वेळी आणि पहाटे दृश्यमानतेवर याचा परिणाम होणार असल्या कारणानं वाहन चालकांना खबरदारी बाळगण्याचा इशाराही यंत्रणांनी जारी केला आहे.
मुंबई - उपनगरंही गारठली!
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, शहरात किमान तापमानाचा आकडा 20 अंशांच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. धुक्याची चादर शहरातही पाहायला मिळणार असून, सायंकाळनंतर सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर आणि रायगडमध्येसुद्धा हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील.
कुठे आणखी तीव्र होणार थंडीची लाट?
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट आणखी तीव्र होत असून सोलापूरपर्यंत हीच स्थिती पाहता येणार आहे. अगदी काश्मीर आणि हिमाचलमध्ये वाहणाऱ्या शीतलहरींप्रमाणंच थंडीचा कडाका आता महाराष्ट्रात जाणवणार असल्या कारणानं घराबाहेर पडावं की नाही? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.थंडीच्या या वातावरणाला कोकण, मराठवाडा आणि विदर्भसुद्धा अपवाद नसून, नांदेड, परभणी, जालनासह नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावची इथंही किमान तापमान 12 ते 13 अंशांदरम्यान राहणार असून शीतलहरी धीम्या गतीनं सबंध महाराष्ट्र व्यापत असून येत्या 48 तासांमध्ये हवामानात फारसे बदल अपेक्षित नसल्याचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.