मुंबई: महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ रखडलेल्या या निवडणुका आता एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता वाढली असून, राज्य निवडणूक आयोग 15 डिसेंबरनंतर कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी येत्या जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, याआधी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकांमध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. या ठिकाणी आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जातील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र, आता आरक्षणाची मर्यादा नियमांनुसार निश्चित केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.माहितीनुसार, 15 डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते. या निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या प्रमुख महानगरपालिकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.