"बॉलीवूडमध्ये फक्त पैशांसाठी."; दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांचं वक्तव्य, हिंदी चित्रपटांबद्दल म्हणाले.
प्रकाश राज मनोरंजन विश्वातील अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकारांपैकी एक आहेत. ते तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम व हिंदी या इंडस्ट्रीमध्ये गेली ३८ वर्षे सातत्याने काम करीत आहेत. पण, नुकतेच त्यांनी बॉलीवूडमधील चित्रपट त्यांची मुळं विसरले आहेत आणि हिंदी सिनेमापेक्षा तमीळ व मल्याळम चित्रपटांचे विषय अधिक चांगले आहेत, असंही म्हटलं आहे.
प्रकाश राज यांनी त्यांच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. प्रकाश राज अनेकदा इंडस्ट्रीतील, तसेच समाजातील मुद्द्यांवर त्यांची मतं व्यक्त करीत असतात. अशातच आता केरळ साहित्यिक महोत्सवात त्यांनी हिंदी सिनेमांबद्दल प्रतिक्रिया देताना केवळ बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी पाहून चित्रपट बनवले जात आहेत, असं म्हटलं आहे.
प्रकाश राज यांचं बॉलीवूडबद्दल वक्तव्य
प्रकाश राज म्हणाले, “सध्याच्या घडीला मला असं वाटतं की, मल्याळम व तमीळ सिनेमासृष्टी खूप चांगले चित्रपट बनवत आहे; तर हिंदी सिनेमा दुसरीकडे त्यांची मुळं विसरला आहे. सगळं खूप छान, सुंदर प्लास्टिकसारखं आहे. आमच्या दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे सांगण्यासाठी विषय आहेत. तरुण तमीळ दिग्दर्शक दलितांचे विषय मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आशा वाढत आहेत.”प्रकाश राज पुढे म्हणाले, “मल्टीप्लेक्सेस आल्यानंतर बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीनं फक्त मल्टीप्लेक्ससाठी चित्रपट बनवणं सुरू केलं. खूप क्यूट अशा प्रकारचे चित्रपट असतात. कारण- त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पेज ३ संस्कृती फॉलो करीत आहेत आणि त्यामुळे त्यांचा राजस्थान व बिहार येथील ग्रामीण संपर्क तुटला आहे.” प्रकाश राज यांनी पुढे स्वातंत्र्यानंतर हिंदी सिनेमा सर्वधर्मसमभाव जपत होता. तेव्हा १९७७ मध्ये मनमोहन देसाई यांनी ‘अमर अकबर अँथनी’सारखा चित्रपट बनवला होता. त्यात अमिताभ बच्चन यांनी अँथनी हे पात्र साकारलं होतं; ऋषी कपूर यांनी अकबर व विनोद खन्ना यांनी अमर या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे लोकांमध्ये एकजूट आणि देशसेवेची भावना निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं, असं म्हटलं आहे.प्रकाश राज पुढे म्हणाले, “आता तसं काहीच राहिलेलं नाही. आजच्या काळात फक्त पैसे आणि दिसणं महत्त्वाचं झालं आहे. रील, पेज ३ व प्रमोशन या सगळ्या गोष्टींचं महत्त्व वाढलं आहे. या प्रवासात मला असं वाटतं की, इंडस्ट्रीचा प्रेक्षकांबरोबरचा संपर्क तुटला आहे.” दरम्यान, प्रकाश राज अलीकडेच धनुष व क्रिती सेनॉनच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात झळकले होते. त्यांनी क्रिश्ना वामसी यांच्या २००२ साली आलेल्या ‘शक्ती’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘खाकी’, ‘सिंगम’, ‘वाँटेड’, ‘दबंग’ , ‘भाग मिल्खा भाग’, ‘हिरोपंती’, ‘गोलमाल अगेन’ व ‘वेंकी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.