बारामती येथील भीषण विमान अपघातात केवळ महाराष्ट्राने एक खंबीर नेतृत्वच गमावले नाही, तर अजित पवार यांच्याकडे सावलीप्रमाणे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाची कायमची सुटली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांच्यावर काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव अनंतात विलीन झाले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
रात्री साडेअकराला अखेरचा निरोप
विदीप जाधव यांचे पार्थिव गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे पोहोचले. पालखी तळावर त्यांच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण गाव लोटले होते. 'विदीप जाधव अमर रहे'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस दलाच्या वतीने त्यांना हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
तो' शेवटचा निरोप ठरला
जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील कळवा-विटावा परिसरातील कृष्णा विहार गल्लीत वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण वसाहत सुन्न झाली. शेजारी राहणाऱ्यांनी जड अंतःकरणाने सांगितले की, "सकाळी साडेसहा वाजता त्यांना कामावर जाताना पाहिले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी हात उंचावून हसत निरोप दिला. मात्र, अवघ्या दोन तासांत ही काळीज चिरणारी बातमी येईल, असे कधीच वाटले नव्हते."२७ वर्षांपासूनचे त्यांचे एक मित्रही भावूक झाले होते. त्यांच्या मते, विदीप जाधव हे केवळ एक पोलीस अधिकारी नव्हते, तर ते एक सुसंस्कृत आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्त्व होते. बुधवारी सकाळी त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे बाय करण्यासाठी हात हलवला, तीच त्यांची शेवटची भेट ठरली.
चिमुकल्यांच्या डोक्यावरून हरपले पितृछत्र
विदीप जाधव यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अपघाताच्या वेळी त्यांचे आई-वडील मूळ गावी होते. या चिमुकल्यांना आपल्या वडिलांचे छत्र हरपल्याची कल्पना देणेही कठीण झाले आहे. गेल्या २२ वर्षांपासून मुंबई पोलीस दलात असणाऱ्या जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याचे पालन केले.
अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
चार्टर्ड विमानात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, त्यांच्या सहकारी पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि या पाचही जणांनी जगाचा निरोप घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.