घोटी: घोटी - वाडीवऱ्हे शिवारात ऑक्टोबर २०२५ मध्ये घडलेल्या अपहरण, ठार करण्याची धमकी, खंडणी आणि तब्बल ४०० कोटी रुपयांच्या नोटांचे कंटेनर लुटल्याच्या कथित प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर यांच्या देखरेखीखाली तपास केला जाणार आहे. या प्रकरणी 'सकाळ'ने रविवार (ता. ११)च्या अंकात दिलेल्या वृत्तानंतर पोलिस आणि प्रशासनाच्या पातळीवर गतिमान हालचाली होत वरील निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी संदीप दत्ता पाटील (रा. नाशिक रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी, जनार्दन धायगुडे (मुंबई) यांनी अपहरण करून पिस्तूलचा धाक दाखवत त्यांच्यासह कुटुंबीयांना ठार करण्याची धमकी देण्यात आली, तसेच वरीलपैकी चौघांनी ४०० कोटींच्या नोटांचे कंटेनर लुटल्याचा संदीप पाटील यांच्यावर आरोप केला आहे.फिर्यादीतील चलनातून बाद झालेल्या ४०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख अतिशय धक्कादायक आहे. या साऱ्या प्रकरणाचा तपास आता ४०० कोटींच्या नोटा आल्या कुठून आणि त्या कुठे नेल्या जात होत्या, याभोवती केंद्रित झाला आहे. या प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर, संवेदनशील व उच्च आर्थिक मूल्याचे असल्याने, तसेच यात राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता निष्पक्ष व स्वतंत्र तपासासाठी 'एसआयटी'ची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. समितीत अनुभवी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर तज्ज्ञ व तांत्रिक विश्लेषकांनाही तपासात सहभागी करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.