नागराज मंजुळेंचा सैराट सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात परश्याच्या मित्राची भूमिका साकारून अभिनेता तान्हाजी गालगुंडे घराघरात पोहोचला. तान्हाजीला सैराटमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरही त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र या दरम्यान त्याची प्रचंड आर्थिक फसवणूक झाली. जवळच्याच मित्रांनी फसवल्याचं तान्हाजी गालगुंडेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सैराटनंतर चांगले पैसे यायला लागले होते. मात्र त्या पैशांचं काय करायचं हे माहीत नसल्याने फसवणूक झाल्याची खंत तान्हाजीने व्यक्त केली.
तान्हाजीने सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आर्थिक फसवणुकीचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, "सैराट झाल्यानंतर माझ्याकडे चांगले पैसे यायला लागले. चांगले सिनेमे मी केले. त्यामुळे पैसे मिळायला लागले. पण तेव्हा या पैशांचं काय करायचं तेच मला माहीत नव्हतं. गावाकडच्या माणसांना पैशाबाबतीत फार अज्ञान असतं. त्यांना खरंच काही माहीत नसतं. असे काही मित्र आले माझे की ते म्हणाले आपण काहीतरी व्यवसाय करू. मग तू मला एवढे पैसे दे. काही जण म्हणाले एवढे पैसे दे तुला एवढे करून देतो. असे काही मित्र आले की मला पैशाची गरज आहे. तू मला दे मग तुला परत देतो. यामध्ये मग अशी वेळ आली की मी माझ्याजवळ काहीच पैसे ठेवले नाहीत. मी हात वर करून सगळे पैसे देऊन टाकले. पण, ती माणसं फक्त पैशासाठी आली होती. त्यांचा इतर दुसरा काहीच उद्देश नव्हता". "पैसे घेतल्यानंतर ते सगळे गायब झाले. त्यानंतर मला मानसिक त्रासही झाला. ते लोक माझा फोन उचलत नव्हते. काहींनी मला ब्लॉक केलं. मी त्यांना मित्र म्हणून खूप जवळचं मानलं होतं. पण मी त्यातून एक गोष्ट शिकलो की तुला लाँग टर्म रिलेशन टिकवायचंय तर तू व्यवहार नाही केला पाहिजे. किंवा व्यवहार जरी केला तरी तो एवढाच केला पाहिजे त्या पैशाचा तुला फरक पडला नाही पाहिजे. म्हणजे तुझ्याकडे जर १० लाख रुपये आहेत. तर तू ५ हजार रुपयांचाच एखाद्यासोबत व्यवहार केला पाहिजे. १० लाखातले ५ हजार गेले तरी तुला फरक पडणार नाही. पण १० लाख देऊन टाकले तर आपल्यासारखी माणसं संपूनच जातात. कारण एवढे पैसे कमावणं खूप अवघड आहे", असंही तान्हाजीने सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.