Big Breaking News: बीडसह महाराष्ट्र हादरला ! पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सरकारी यंत्रणा हायअलर्टवर
महाराष्ट्रातील बीडसह सर्व मुख्य टपाल कार्यालये आणि पासपोर्ट सेवा केंद्रांना आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी ई-मेल आल्याने बुधवारी (25 मार्च 2026 ) राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीवजा संदेशामुळे बीडसह राज्यातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. दुपारी 12 वाजून 10 मिनिटांला सायनॉइड या विषारी वायूचा वापर करून 16 ठिकाणी भीषण स्फोट घडवून आणू, असा इशारा या ई-मेलमध्ये देण्यात आला आहे.
नेमका काय आहे तो धमकीचा संदेश?
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला 'कोयंबटूरचे मुसलमान' म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत. तामिळनाडूतील काही राजकीय घडामोडी, केंद्र सरकारची यूएपीए (UAPA) अंतर्गत झालेली कारवाई आणि या प्रकरणांमध्ये माध्यमांनी अपेक्षित साथ न दिल्याने निर्माण झालेल्या रागातून हे पाऊल उचलल्याचा दावा या गटाने केला आहे. विशेष म्हणजे, हे स्फोट घडवण्यासाठी नक्षलवादी आणि आयएसआय (ISI) सेलची मदत घेतल्याचेही या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
बीड टपाल कार्यालयात एकच धावपळ
या धमकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील मुख्य टपाल कार्यालयात कमालीची गुप्तता आणि सतर्कता पाळण्यात आली. यासंदर्भात खात्री करण्यासाठी बीड पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारचा निनावी ई-मेल आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी 12 वाजेच्या सुमारास टपाल कार्यालयातील सर्व ग्राहक आणि नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले होते. काही काळ कार्यालयीन कामकाज थांबवून परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली.
सुरक्षा यंत्रणा सतर्क, शोधमोहीम सुरू
राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमधील पासपोर्ट कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तपासणी सुरू केली आहे. हा ई-मेल कुठून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून आला आहे, याचा शोध सायबर सेलकडून घेतला जात आहे.
दहशतीचे वातावरण की खोडसाळपणा?
दुपारी 12 वाजून 10 मिनिटांची स्फोटाची वेळ निघून गेल्यावर प्रशासनाने काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तरी भीतीचे वातावरण अद्याप कायम आहे. हा केवळ यंत्रणांना वेठीस धरण्यासाठी केलेला खोडसाळपणा आहे की यामागे एखादे मोठे षडयंत्र आहे, याचा तपास आता गुप्तचर विभागामार्फत केला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.