राज्यात आरटीई (शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत) प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत अस्तित्वात असलेली 'घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळा' ही अट राज्य शासनाने अखेर मागे घेतली आहे. त्यामुळे आता पालकांना 1 किलोमीटरपेक्षा दूर असलेल्या शाळांसाठीही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी शाळेचे पर्याय वाढले असून प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
या संदर्भात राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती सादर केली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आरटीई अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून 25 मार्च करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयात 1 किलोमीटरची मर्यादा घालण्यात आली होती, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छित शाळेत प्रवेश घेणे कठीण होत होते. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे यांनी सादर केलेल्या पत्रात काही विसंगती असल्याचे नमूद केले होते.
तसेच शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या तरतुदींनुसारच निर्णय घेण्याचे निर्देशही दिले होते. त्यानंतर शासनाने नव्याने पत्र सादर करत 1 किलोमीटरची अट रद्द केल्याची माहिती दिली आणि प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याचिकेचा उद्देश पूर्ण झाल्याने न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
दरम्यान, यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. 16 मार्चपर्यंत अर्ज केलेल्या पालकांना त्यांचा अर्ज 'अनकन्फर्म' करून आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आल्या आहेत. नव्या नियमांनुसार दुरुस्ती करून पुन्हा अर्ज 'कन्फर्म' करता येईल. या बदलामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
