योगींचे चित्रपट निर्मात्यांना खडे बोल: "गुन्हेगारांना हिरो बनवणं थांबवा!"; 'धुरंधर २' च्या निमित्ताने सुनावले
वाराणसी: वाराणसीच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट सृष्टीला एक कडक आणि स्पष्ट सल्ला दिला आहे. गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रपटांवर त्यांनी कडाडून टीका केली असून, 'गुन्हेगारांना पडद्यावर हिरो बनवू नका, अन्यथा पिढ्या बरबाद होतील,' असा इशारा दिला आहे. वाराणसीतील सम्राट विक्रमादित्य यांच्या जीवनावरील महानाट्य कार्यक्रमात बोलताना योगीजींनी बॉलिवूड आणि चित्रपट निर्मात्यांना आरसा दाखवला.
तरुणाईवर होणारा परिणाम
मुख्यमंत्री म्हणाले की, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला दिशा देणारे माध्यम आहे. जर चित्रपटात एखाद्या डकेताला किंवा गुन्हेगाराला नायक (Hero) म्हणून दाखवले, तर तरुण पिढी त्यांनाच आपला आदर्श मानायला लागते. अशा प्रकारच्या चित्रपट साहित्यामुळे देशातील अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे, कारण त्यांच्यासमोर चुकीचे नायक उभे केले गेले.
'धुरंधर २' आणि नव्या भारताचा कल
विशिष्ट चित्रपटाचे नाव न घेता, पण 'धुरंधर २' सारख्या विषयांच्या संदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "नव्या भारताने आता सर्व डाकूंना आणि गुन्हेगारांना धुडकावून लावले आहे. एक काळ असा होता की, चांगल्या पात्रांना खलनायक आणि खलनायकांना नायक म्हणून दाखवले जायचे. पण आजची जनता जागरूक झाली आहे."
प्रेरणादायी चित्रपट बनवा
योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना आवाहन केले की, असे चित्रपट बनवा जे राष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरतील. सम्राट विक्रमादित्य, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांचे जीवन पडद्यावर आणा, जेणेकरून तरुणांना योग्य दिशा मिळेल.
उज्जैन आणि काशीचे आध्यात्मिक नाते
या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव देखील उपस्थित होते. यावेळी योगीजींनी अयोध्येप्रमाणेच उज्जैन आणि काशीच्या संबंधावर प्रकाश टाकला, ज्याप्रमाणे राम-लक्ष्मण आणि कृष्ण-बलराम यांची जोडी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे संत भर्तृहरी आणि सम्राट विक्रमादित्य यांची जोडी भारतीय परंपरेत महत्त्वाची आहे.संत भर्तृहरी हे नाथ संप्रदायात दीक्षित होते आणि त्यांची साधनास्थळी काशीमध्ये आहे, तर विक्रमादित्यांची कर्मभूमी उज्जैन होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, 'नव्या उत्तर प्रदेशात' गुन्हेगारीला जागा नाही आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नायकांनाच समाजात स्थान मिळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.