बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा: IAS अधिकारी अटकेत, संतापाचा कडेलोट; "कोठडीत मेलो तरी चालेल" म्हणत जेवण नाकारलं!
बीड: राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा वाटप प्रकरणात अटकेत असलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी आणि आयएएस (IAS) अधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेनंतर बीडच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी अटक झाल्यापासून पाठक यांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला असून, कोठडीत त्यांनी अन्न-पाणी घेण्यासही नकार दिला होता.
"कोठडीत मेलो तरी चालेल!"
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर लातूर ते बीड या प्रवासादरम्यान पोलिसांनी पाठक यांना पाणी पिण्याचा वारंवार आग्रह केला. मात्र, अत्यंत संतप्त झालेल्या पाठक यांनी "मी कोठडीत मेलो तरी चालेल, पण पाणी घेणार नाही," असं म्हणत पोलिसांचा आग्रह धुडकावून लावला. गुरुवारी रात्रभर ते जागेच होते आणि त्यांनी अन्न-पाणी घेतलं नव्हतं. मात्र, रात्री उशिरा त्यांनी अत्यंत थोडं जेवण केलं. शुक्रवारी दुपारी २ वाजता जेव्हा त्यांना कोठडीबाहेर काढले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून 'ग्रीन सिग्नल'
अविनाश पाठक हे आयएएस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात पुराव्यांची भक्कम साखळी तयार केली होती. या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली होती. तिथून कारवाईसाठी 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यानंतरच पोलिसांनी गुरुवारी अटकेचे पाऊल उचलले, असं सांगितलं जात आहे.
एसआयटीच्या रडारवर अनेक अधिकारी
या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीने आता आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शोधात पोलीस पथक कार्यालयात पोहोचले होते, मात्र तो अधिकारी उपस्थित नव्हता. लवकरच या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अविनाश पाठक यांना एसआयटीने अटक केली असली, तरी त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना राज्य शासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. जोपर्यंत शासन ही परवानगी देत नाही, तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या दोषारोपपत्र दाखल करता येणार नाही, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.पाठक यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (कलम ७, १३), लवाद व समेट अधिनियम, तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १९८, १९९, ३१६ (२), ३१८(४), ३३६, ३३८, ३४० अशा विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटकेनंतर पाठक यांच्या हितचिंतकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती, मात्र पोलिसांनी कोणालाही भेटू दिले नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांची एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.