खड्डेच खड्डे चोहीकडे, गेले आयुक्त कुणीकडे? सांगलीत ‘ससेहोलपट’; सिव्हिल हॉस्पिटलसमोर साठले ‘तळे’!


सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, संपूर्ण शहरात 'खड्ड्यांचे साम्राज्य' निर्माण झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून, वाहनधारकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. त्यातच सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य गेटसमोरच पावसाच्या पाण्याचे भलेमोठे तळे साचल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या नरकयातनांमधून वाट काढावी लागत आहे. “चोहीकडे खड्डेच खड्डे, मग महापालिका आयुक्त गेले कुठे?” असा संतप्त सवाल आता नागरिक आणि सांगलीकर उपस्थित करत आहेत.

​रुग्णांच्या जखमेवर पालिकेचे ‘मीठ’; सिव्हिल समोर 'तळ साचलं'!
​सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आधीच आजाराने त्रस्त असतात. त्यात भर म्हणून हॉस्पिटलच्या मुख्य गेटसमोर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून त्यांना मार्ग काढावा लागत आहे. रुग्ण आणि त्यांच्या हतबल नातेवाईकांना या दूषित पाण्यातूनच पायपीट करावी लागत आहे. येथील स्थानिक गाळेधारक, खोकीधारक आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या, आंदोलनाचा इशारा दिला; तरीही सुस्त प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मंजूर रस्ता गेला कुठे?

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील हा रस्ता आधीच मंजूर झालेला आहे, अशी माहिती समोर येत आहे. जर महापालिकेने या रस्त्याचे काम वेळेत आणि तातडीने सुरू केले असते, तर आज येथे तळे साचण्याची आणि रुग्णांचे हाल होण्याची नौबत आली नसती. पण प्रशासनाच्या दिरंगाईची किंमत सामान्य जनतेला मोजावी लागत आहे.

​महापालिका क्षेत्रात वाहनधारकांचे मरण!
केवळ सिव्हिल हॉस्पिटलच नव्हे, तर संपूर्ण सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात रस्त्यांची चाळण झाली आहे.

​रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.

​खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते अपघातांना आमंत्रण ठरत आहेत.

​रिक्षा, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांचे मोठे नुकसान होत असून नागरिकांचे मानसिक आणि शारीरिक हाल होत आहेत.

​शहराची ही दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहताना महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी नक्की कुठे गायब आहेत? ते एसी केबिनमधून बाहेर पडून जनतेचे हाल पाहणार की नाही? असा आक्रमक सवाल सांगलीकरांनी विचारला आहे.

​आता तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार की नागरिक आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तात्काळ रस्ते दुरुस्त न झाल्यास जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.