बिहारमधील सहरसा जिल्ह्यात एका विवाह समारंभादरम्यान जेवणातील मेनूवरून झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटांतील तुंबळ हाणामारीत झाले. लग्न मांडवातच झालेल्या राड्यात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये काही तरुण काठ्यांनी मारहाण करताना आणि तलवारी नाचवताना दिसत आहेत.
लग्नातील जेवणावरून वाद
सिमरी बख्तियारपूरमधील मोहम्मद अन्वर यांचा मुलगा मोहम्मद अब्दुल्ला (उर्फ चांद) आणि राजनपूर गावातील रहिवासी मोहम्मद जावेद (उर्फ मोटो) यांची मुलगी यांचा हा विवाह होता. सहरसा जिल्ह्यातील महिशी ब्लॉकमधील राजनपूर गावात विवाह समारंभ होता. यावेळी लग्नाच्या जेवणावरून वाद झाला.
मटण ठरलं होतं, चिकन वाढल्याने वाद
विवाह सोहळा शांततेत पार पडला. त्यानंतर पाहुण्यांना जेवण वाढण्यात आले. संतप्त झालेल्या नवरदेवाच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला की, लग्नात मटणाचे जेवण द्यायचे ठरले होते, परंतु त्याऐवजी चिकन का वाढले, अशी विचारणा केली. यावरून पाहुणे आणि यजमानांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली.
काठ्या, बुक्के, काठ्यांसह तलवारींचा वापर
चिकन का वाढले अशी विचारणा होताच शाब्दिक वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. काठ्या, बुक्के आणि इतर शस्त्रांचा वापर करण्यात आला. या हाणामारीनंतर विवाहस्थळी एकच गोंधळ उडाला. या संघर्षात वरपक्षाकडील सात तर वधूपक्षातील ५ जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला परिस्थिती निवळली होती. त्यानंतर काही वेळातच, वधूच्या कुटुंबीयांनी वरातीवर अचानक हल्ला केला, ज्यात अनेक पाहुणे जखमी झाले, असा दावा वराच्या काकांनी केला. या मारामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका क्लिपमध्ये काही पुरुष पाहुण्यांना काठ्यांनी मारताना आणि उघडपणे तलवारी नाचवताना दिसत आहेत.
पोलिसांची एन्ट्री आणि तपास सुरू
या घटनेतील जखमींना उपचारासाठी सिमरी बख्तियारपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा कुठे परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.