जत : राज्यातील दूध भेसळीच्या गंभीर प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यभर सुरू असलेल्या कारवाईनंतर दूध संकलनात झालेली घट, अनेक दूध संघांमधील संशयास्पद व्यवहार आणि या भेसळीच्या साखळीमागील सूत्रधारांचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर कधी आणणार, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला.
आ. पडळकर म्हणाले की, जनतेच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. राज्यातील सर्व दूध संघांची चौकशी झाली पाहिजे. कारवाईपूर्वी किती दूध संकलन होत होते आणि कारवाईनंतर त्यात किती घट झाली, याची अधिकृत आकडेवारी सरकारने जाहीर करावी. चौकशीत कोणताही दूध संघ, अधिकारी किंवा व्यवस्थापन दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या व्यापक कारवाईनंतर राज्यातील दूध भेसळीचे प्रमाण अंदाजे २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दूध संकलनातही काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, कारवाईपूर्वी आणि कारवाईनंतरच्या दूध संकलनाची अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध नसून, तपास पूर्ण झाल्यानंतर ती सभागृहासमोर सादर केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.