महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षांदरम्यान सुरु शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे.
फडणवीस यांनी आज जालन्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षावरील दाव्यावरुन सुरु असलेल्या प्रकरणावर थेट सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत विधान केलं आहे. केवळ शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीचाही उल्लेख फडणवीस यांनी आपल्या विधानात केलाय.
फडणवीसांनी शिवसेना खटल्यासंदर्भात काय म्हटलं?
शिवसेनेसंदर्भात सुनावणी सुरु असल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी, "सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देणार आहे. लोकन्यायालयाने 2024 च्या निवडणुकीत निर्णय दिला आहे," असं म्हटलं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भरघोस मतदान केल्याचा संदर्भ फडणवीसांनी दिला. "लोकन्यायालयाने एकनाथ शिंदेंची आणि राष्ट्रवादी अजित पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब ठीक आहे आता सुप्रीम कोर्ट काय करतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे," असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीवरुन राऊत आज काय म्हणाले?
दरम्यान, दुसरीकडे आज खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना, "पाच दिवस आमचा युक्तिवाद सुरु आहे. काल तो अर्धवट राहिला. मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत युक्तिवाद करतील. सुप्रीम कोर्टाने आम्हाला जितका वेळ हवा आहे तितका दिला आहे. अपात्रतेचा वेगळा विषय आहे. आता जो युक्तिवाद सुरु आहे तो पक्ष आणि चिन्ह यासंदर्भात आयोगाने शेण खाल्लं आहे, अमित शाह आणि आयोग यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटींना पक्ष आणि चिन्ह मिंधे गटाला विकलं," असा आरोप केला आहे.एवढ्यावरच न थांबता राऊत यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित राहिल्यावरूनही टोला लगावला. "आता ते (मोदी, शाह) झोपतच नाही, दोघांचे चेहरे पाहा. लोकलज्जेस्तव 20 दिवसांनी सभागृहात आले होते, खाली मान घालून आले आणि तसेच गेले. 56 इंच वैगेरे काहीच नव्हतं. आता दिल्ली खाली करण्याची वेळ आली आहे," असं सूचक विधान राऊत यांनी केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.