सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ६० मीटर अंतरातील सर्व ढाबे, हॉटेल्स, खानावळी आणि व्यावसायिक बांधकामे पूर्णत: हटविली जाणार आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेला कडक निर्देश दिले आहेत.
त्यानुसार आता राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचएआय) बाळे, मोहोळ, मोहोळ-टेंभुर्णी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-तुळजापूर यासह अन्य महामार्गांलगतच्या अतिक्रमित ढाबे चालकांसह १०० हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
सोलापूर-पुणे महामार्गासाठी एकूण ६० मीटर (एकूण २१० फूट) अंतर मोकळे सोडणे बंधनकारक आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ३० मीटर अंतरात कोणताही ढाबा, खानावळ, हॉटेल, व्यावसायिक बांधकाम असू नये, तेथे वाहने देखील थांबवू नयेत, असा नियम आहे. पंढरपूरमधील महामार्गांसाठी हेच अंतर ४५ मीटर (दोन्ही बाजूला २२.५ मीटर) आहे. तेथील बायपासजवळील १८ मीटरमध्ये व्यावसायिक बांधकामे नको, असेही बंधन आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'एनएचएआय'ची यंत्रणा अलर्ट झाली असून, त्या अंतरात बांधकाम केलेल्यांचा सर्व्हे करून त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र, सद्य:स्थिती 'जैसे थे'च पाहायला मिळते. यावर जिल्हाधिकारी काही दिवसांत बैठक घेऊन अशांवरील कारवाईचे नियोजन करणार आहेत.
आढावा घेऊन पुढील कार्यवाही
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून महामार्गांलगतची सद्य:स्थिती जाणून घेऊ. त्यानंतर नियमबाह्य बांधकामांवरील कारवाईसंदर्भात नियोजन केले जाईल.
- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी, सोलापूर
महामार्गाच्या जागेतील व्यावसायिकांना नोटिसा
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ६० मीटर अंतरात कोणतेही व्यावसायिक बांधकाम नको आहे. हे अंतर दोन्ही बाजूला समान नाही. काही ठिकाणी एका बाजूला २५, २७ मीटर तर दुसऱ्या बाजूला ३३, ३५ मीटर अंतर आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-पुणे, मोहोळ-टेंभुर्णी, सोलापूरजवळील बाळेसह अन्य ठिकाणी महामार्गांच्या जागेतील व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.- स्वप्नील कासार, प्रकल्प संचालक, एनएचएआय, सोलापूर
प्रत्येक महिन्याला ४२ जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघात व अपघाती मृत्यू दिवसेंदिवस वाढतच आहेत. गतवर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ७७४ अपघातात ४१३ जणांचा मृत्यू झाला होता. चालू वर्षात अपघात ७६२ झाले, पण अपघातात ४२६ जणांचा मृत्यू (दरमहा सरासरी ४२ मृत्यू) झाला आहे. १ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत सुमारे ५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कुर्डुवाडी, टेंभुर्णी, वेळापूर, करमाळा, बार्शी, पंढरपूर ग्रामीण व मोहोळ या ठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यूची 'आरटीओ'कडे नोंद आहे. यातील बहुतेक अपघात महामार्गांवरच झाले आहेत.
सहा महिन्यांतील अपघात व मृत्यू (तालुकानिहाय)
तालुका अपघात मृत्यूमाढा ७५ ४८माळशिरस ७५ ५२सांगोला ६९ ४३करमाळा २८ १७बार्शी ४४ ३१मंगळवेढा ४० २५पंढरपूर ११० ५३अक्कलकोट २८ १६मोहोळ ८७ ५४दक्षिण सोलापूर ४० १७उत्तर सोलापूर ५० २७सोलापूर शहर ११६ ४३एकूण ७६२ ४२६
पाटबंधारे विभागाच्या जागेवरही अतिक्रमण
सोलापूर-पुणे महामार्गावर पुण्याकडे जाताना पाटबंधारे विभागाच्या जागेतही अनेक ढाबे, व्यावसायिक बांधकामे झाली आहेत. यांना वारंवार नोटिसा बजावल्या जातात. अनेकदा नोटिसा बजावणारा कर्मचारी त्यांच्याकडून काही रक्कमही घेत असल्याचे अनेकजण खासगीत सांगतात. अशांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.