पोलिसांची परवानगी नाही पण मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 18 वा दिवस आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून जरांगे आज, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मात्र दुसरीकडे त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
मात्र, मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी अद्याप मिळालेली नाही. मुंबई पोलिसांनी यापूर्वी दोनदा आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या वतीने पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला असून, हा तिसरा अर्ज आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवामुळे पोलिसांवर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव, गणेशमूर्तींच्या मिरवणुका आणि विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढते. वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सुरू असताना आंदोलनांना परवानगी न देण्याची भूमिका पोलिसांकडून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनाला परवानगी दिल्यास गर्दीत आणखी वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच, गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी तैनात करावे लागतात. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी स्वतंत्र बंदोबस्त उपलब्ध करून देताना पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. या कारणांमुळे मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळणे सध्या कठीण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. गणेशोत्सव संपल्यानंतर आंदोलनांना परवानगी देण्याबाबत विचार होण्याची शक्यता असल्याची माहितीही समोर आली आहे.
५० जणांना आंदोलनाची परवानगी देण्याची मागणी
मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जात 50 जणांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनासंदर्भात पोलिसांकडून घालण्यात येणाऱ्या सर्व नियम व अटींचे पालन केले जाईल, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच, 18 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे दिसून येत आहे. आता त्यांच्या तिसऱ्या अर्जावर मुंबई पोलिसांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.