Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 'इतका' वाढला महागाई भत्ता !

महाराष्ट्र राज्यातील 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 'इतका' वाढला महागाई भत्ता !



महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी हाती आली आहे. फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास 17 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाअन्वये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. खरे तर, मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला. आधी केंद्रिय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र या वाढीनंतर हा भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला.

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली गेली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली. दरम्यान, आता महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला ?

महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, राज्य शासकीय सेवेतील 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% इतका करण्यात आला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना आधी 53 टक्के इतका महागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये दोन टक्के वाढ करणे प्रस्तावित होते. यानुसार आज राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला असून याचा जीआर निर्गमित करण्यात आला आहे.

15 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग होईल.

किती महिन्यांचा महागाई भत्ता फरक मिळणार?
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. मे महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि 4 महिन्याचा महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या हातात जून महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.