''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर
मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला.
शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित
पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं.
त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ, असं पवार म्हणालेले.
त्यानंतर अनेक स्तरांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच बीडच्या माजलगाव
विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी
आपली भूमिका स्पष्ट केली. सोळंकेंना मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती,
त्यावर ते बोलले.
काय म्हणाले प्रकाश सोळंके?
''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय. मी पाचवी टर्म आमदार आहे, अनुभवी आहे, मला पक्षाचा (राष्ट्रवादी काँग्रेस) ३५ वर्षांचा इतिहास माहिती आहे. पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसींसाठी राखीव असावा, असं वाटतंय. इथे बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही, असं पक्षाने ठरवल्याचं दिसंतय.''सोळंके पुढे म्हणाले, पक्षाचा इतिहास मला माहिती आहे. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक राहिलेला आहे. मागील अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिलेला आहे. परंतु मंत्रिपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते. शरद पवारांनीही तेच केलं आणि अजित पवारही तेच करत आहेत. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितलं जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.. हे माझे अनुभवाचे बोलत आहेत. अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.