स्वत:च्या गावात नव्हे, दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे शंकास्पद; जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा
मत चोरीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. काहीजण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे निवडणूकाचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, असं जयंत पाटील म्हणाले.
मतांची चोरी भारतात होते हे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य आहे. निवडणूकाचे लागणारे निकाल खरे आहेत का याबाबत पहिल्यांदा सामान्य माणूस विचार करायला लागला आहे असे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय. जत येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते.
मत चोरीचे अनेक प्रकार देशात व राज्यात उघड- जयंत पाटील
मत चोरीचे अनेक प्रकार देशात व राज्यात उघड होत आहेत. भाजपला सोयीचे निवडणूक आयोगाचे वर्तन आहे. आमचे आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा, ही आमची मागणी आहे असेही जयंत पाटील म्हणाले. मत चोरीचा आरोपाचा हा गोंधळ सुरू असताना आता एक नवीन कायदा आणत आहेत. त्यात मुख्यमंत्री, मंत्री अटक असल्यास 30 दिवसानंतर त्यांना पदावरून काढून टाकले जाणार. हा रोख विरोधी पक्षातील नेत्यांवर असणार हे स्पष्ट आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज-उद्धव ठाकरेही सावध-
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या हा मुद्दा केंद्रस्थानी येऊ लागला आहे. काल पुण्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. मतदार याद्यांवर काम करा, नावं व्यवस्थित तपासा, असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. तर आज दहिसरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हाच मुद्दा अधोरेखित केला. घराघरांत जा, मतदार यादी तपासा...कारण आपलं मत चोरी होत आहे. त्यामुळे ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी गंभीरपणे पार पाडली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंकडून एकाच मुद्द्यावर भर दिला जात असल्याने, पुढील रणधुमाळीत मतदार याद्यांचा विषय मोठ्या चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.