मुंबई : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एका वकिलाने आपल्या घरी स्वयंपाक करणाऱ्या महिलेबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी रोज अर्धा तास जेवण बनवण्यासाठी येणारी महिला दर महिन्याला १८,००० रुपये पगार घेते. विशेष म्हणजे ती महिला त्यांच्या कॉम्प्लेक्समधील आणखी १० ते १२ घरांमध्येही अशाच प्रकारे काम करते, त्यामुळे तिचे एकूण मासिक उत्पन्न सुमारे १.८ ते २ लाख रुपये इतके होते.
वकिलाने लिहिले की, त्या महिलेला मोफत जेवण, चहा मिळतो आणि जर वेळेत पगार दिला गेला नाही, तर ती कोणतीही पूर्वसूचना न देता काम सोडून जाते. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे अवास्तव असल्याचे सांगितले, तर काहींनी समर्थन करत असे म्हटले की, मुंबईत स्वयंपाक करणाऱ्या कामगारांचा पगार खरंच एवढा असतो आणि ते त्यासाठी पात्र देखील आहेत.
अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिसाद देताना लिहिले की, हे काम करणारे लोक व्यावसायिक असतात. ते माजी मालकांचे फीडबॅक देतात, आधार कार्डासह इतर आवश्यक कागदपत्रे देण्यास तयार असतात, परंतु पगाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत. आणखी एका वापरकर्त्याने सांगितले की, ही व्यावसायिक मंडळी घरातील वेळ, सुविधा आणि अपेक्षांनुसार त्यांचा दर निश्चित करतात. वकिलाच्या पोस्टवर एका महिलेनं आश्चर्य व्यक्त करत लिहिलं, "एका घरातून १८,००० रुपये घेतले, तर १०-१२ घरांमधून जवळपास दोन लाख रुपयांपर्यंत मासिक कमाई होते!" हे ऐकून अनेकजण स्तब्ध झाले आहेत.
या चर्चेमुळे एकूणच घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचे व्यावसायिक मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे, असे सामाजिक निरीक्षक सांगतात. कामाचा दर्जा, वेळेचे नियोजन आणि निष्ठा यामुळे अशा महिला अनेक घरांमध्ये विश्वासार्ह सेवा देत असतात. या प्रकरणाने पुन्हा एकदा शहरांतील घरगुती मदतनीसांच्या मेहनतीचे आणि त्याच्या आर्थिक मूल्याचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
बंगळुरूतील घरकाम करणाऱ्या महिला कमवतात १ लाख रुपयांपेक्षा जास्त!
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड चर्चेत आहे, ज्यात एका टेक कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आपल्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाच्या मासिक उत्पन्नाची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्या महिलेचे कुटुंब महिन्याला १ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करते, ही बाब अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरली आहे.या कर्मचाऱ्याने सांगितले की, महिला सुमारे तीन ते चार घरांमध्ये काम करते आणि प्रत्येक घरातून १० ते १२ हजार रुपये पगार घेत असल्याने तिचे एकूण मासिक उत्पन्न ३० ते ४० हजार रुपये आहे. त्याचबरोबर, तिचे पती मजुरीचे काम करतात आणि तेही महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमावतात. त्यांचा मुलगा एका कपड्यांच्या दुकानात काम करून १५ हजार रुपये पगार घेतो. त्यांची मुलगी शिलाईचे प्रशिक्षण घेत असून, काही दिवसांत १० हजार रुपयांपर्यंतची कमाई सुरू करेल, असे या टेक कर्मचाऱ्याने नमूद केले आहे.या पोस्टनंतर अनेक लोकांनी मत मांडताना म्हटले की, मेहनत आणि नियोजन केल्यास कोणत्याही क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळवता येते. घरकाम करणाऱ्या महिलांनाही जर वेळेचे व्यवस्थापन आणि सेवा चांगल्या प्रकारे देता आल्या, तर त्या देखील स्वतःचे आणि कुटुंबाचे आर्थिक आयुष्य सुसंस्कृत करू शकतात. या उदाहरणाने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, श्रमाचा अपमान न करता, त्याची योग्य किंमत दिल्यास समाजातील अनेक कुटुंबे सक्षमपणे उभी राहू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.