Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! कसले संविधान?,पाकड्यांना संपवा, अन्यथा जग नीट चालणार नाही': भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

Breaking News! कसले संविधान?,पाकड्यांना संपवा, अन्यथा जग नीट चालणार नाही': भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तान, देशाचे संविधान आणि भारतीय समाजव्यवस्थेबद्दल अत्यंत कठोर आणि आक्षेपार्ह विधाने केल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पाकिस्तानबद्दल अत्यंत कठोर भूमिका

संभाजी भिडे यांनी या कार्यक्रमात पाकिस्तानला थेट लक्ष्य केले. "पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही," असे अत्यंत तीव्र मत त्यांनी मांडले. केवळ पाकिस्तानला संपवणे एवढेच नाही, तर "हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आज शत्रूला संपवलं पाहिजे," असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, याच वेळी, "आपला शत्रू कोण आहे हेच न कळणारा समाज हा मूर्ख समाज आहे," असे म्हणत त्यांनी भारतीय समाजाच्या भूमिकेवरही अप्रत्यक्ष टीका केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली केलेले त्यांचे हे वक्तव्य राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चांना तोंड फोडणारे ठरले आहे.

दांडिया, गणेशोत्सव आणि तरुणाईवर टीका
पाकिस्तानवर भाष्य करण्यासोबतच, भिडे यांनी भारतीय सण-उत्सवांच्या बदललेल्या स्वरूपावरही आक्षेप घेतला. त्यांनी दांडिया खेळावर थेट टीका करत "दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा" असल्याचे विधान केले. नवरात्रीसारखा पवित्र उत्सव फालतू गोष्टींनी 'विकृत' होत आहे, अशी टीका त्यांनी केली. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरे करण्यावर पाश्चात्त्य प्रभावामुळे मूळ परंपरेचा अपमान होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, पण आजचे समाजकार्य दांडिया, फॅशन शो, पार्टीपुरते मर्यादित झाले आहे, असे म्हणत त्यांनी तरुणाईलाही अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.

संविधान आणि देशावर वादग्रस्त भाष्य

संभाजी भिडे यांनी देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि संविधानावर केलेले भाष्य सर्वात जास्त वादग्रस्त ठरले आहे. त्यांनी थेट संविधानाला लक्ष्य करत, "आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. काय संविधान, कसले संविधान?" अशा शब्दांत भारताच्या घटनेचा उल्लेख केला. इतकेच नव्हे, तर त्यांनी भारतीयांच्या इतिहासावरही टीका केली. "भारत हा १३०० वर्षे मुस्लिम आणि युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना गुलामीची लाज वाटत नाही, तो हा निर्लज्ज देश आहे," असे अत्यंत तीव्र भाष्य त्यांनी केले. संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबद्दल अशा प्रकारची भूमिका घेणारे त्यांचे विधान सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले असून, विविध राजकीय नेत्यांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजकीय वादंग वाढण्याची चिन्हे
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यांवरून समाजात दोन गट पडलेले दिसत आहेत. त्यांच्या समर्थकांच्या मते, त्यांनी व्यक्त केलेला रोष राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि पारंपरिक मूल्यांच्या रक्षणासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, विरोधकांकडून देशाच्या लोकशाही आणि संविधानाचा अपमान करणारी भाषा वापरणे अयोग्य असल्याचे म्हणत त्यांच्यावर कठोर टीका केली जात आहे. सांगलीतील या कार्यक्रमानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भिडे यांच्या भाषणावरून येत्या काही दिवसांत आणखी मोठा राजकीय वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.