2024 आधीच राज्यात मोठ्या प्रमाणावर घडामोडी; गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीतून फारकत घेत अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाले. या आमदारांचा शपथविधी होऊन आठ दिवस झाले पण अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरुन आता विरोधकांनी टीका करत आहेत. दुसरीकडे राज्यात निवडणुकांचीही तयारी सुरु झाली आहे.
यापार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे."महाविकास आघाडीचे अनेक नेते आजही आमच्या संपर्कात आहे.यासर्वांचा मानसन्मान ठेवायला पाहिजे. पण कुणाला द्यावं, असा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत. हे सर्वजण यासंदर्भात निर्णय घेतील. 2024 च्या निवडणुकांच्या आधी राज्यात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील," असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबाबत सुर असलेल्या चर्चांवर विचारले असता, गिरीष महाजन म्हणाले, तुम्ही ज्यांचं नाव घेत आहात ते माजी मुख्यमंत्री आहेत. पण आम्हाला पुन्हा तिसरा उपमुख्यमंत्री करता येणार नाही, किंवा दोन मुख्यमंत्री करता येत नाहीत. त्यामुळे सगळ्यांचा मान-सन्मान ठेवला पाहिजे.
याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कधीही विदर्भ दौरा केला नाही की विदर्भातील लोकांना कोणत्याही प्रकारची मदतही केली नाही. उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा हा फक्त देखावा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्रीची कधी पायरी उतरले नाही, तुम्ही कधी मंत्रालयात गेले नाहीत. आता तुम्ही सत्ता गेल्यानंतर विदर्भाचा दौरा करत आहात, असा निशाणा गिरीश महाजन यांनी साधला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.