विट्यात वंचित बहुजन आघाडीचा निषेध मोर्चा
विटा : मराठवाड्यातील दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज विट्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ‘ओबीसी के सन्मान में वंचित आघाडी मैदान में’, ‘मुस्लिम के सन्मान में वंचित आघाडी मैदान में’, अशा घोषणा देत क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, आरोपीला अटक करून सेवेतून बडतर्फ करावे, जरीन खानच्या कुटुंबीयांना ५० लाखांची शासकीय आर्थिक मदत द्यावी. नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, परळी तालुक्यातील कदम कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे, रेणापूर येथील मातंग बांधवांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. आणि भूम येथील फय्याज पठाण मृत्यू प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन शिक्षा द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी केले. सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी, क्रांती सावंत, दुर्योधन साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.