Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्मार्ट मीटरमुळे ग्राहक-महावितरण संघर्ष

स्मार्ट मीटरमुळे ग्राहक-महावितरण संघर्ष



कोल्हापूर : स्मार्ट मीटरची किंमत, पोस्टपेड की प्रीपेड या आणि अशा विविध कारणांनी स्मार्ट मीटरला ग्राहकांचा विरोध वाढत आहे. शहरासह आणि ग्रामीण भागातही विरोध असल्याने महावितरण - ग्राहक संघर्षास धार आली आहे. सध्या तरी पोस्टपेड असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणने कायमस्वरूपी पोस्टपेड असे स्पष्ट न केल्याने भविष्यात प्रीपेडची टांगती तलवार कायम आहे.

 
महावितरण कंपनीने प्रथम शासकीय कार्यालयांना स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुमारे 10 हजारांवर शासकीय कार्यालयांना असे मीटर बसविण्यात आले आहेत. त्यानंतर घरगुती व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना फॉल्टी मीटरच्या नावावर असे मीटर बसविले जात आहेत. तसेच नवीन कनेक्शन घेतलेल्यांना हे मीटर बसविण्यात येत आहेत. नवीन कनेक्शन घेताना कधी एकदा कनेक्शन येईल, या विवंचनेमुळे ग्राहक तक्रार करीत नाहीत. तर फॉल्टी मीटरने अधिकचे वीजबिल येत असल्याने वाढीव बिलास कंटाळलेले ग्राहकही या मीटरला विरोध करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

 
आता घरगुती ग्राहकांना टार्गेट करून मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात विरोधाची धार कमी आहे. तेथे तातडीने कार्यवाही केली जात आहे; मात्र असे प्रमाण अत्यंत कमी आहे. या उलट विरोधाचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूर शहरातील विक्रमनगर टेंबलाईवाडी परिसरात स्मार्ट मीटर बसविण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना पळवून लावण्यात आले आहे. असा प्रकार शहरात ठिकठिकाणी घडत आहे. शहरासह ग्रामीण भागातही या मीटरला विरोध होत आहे. गडहिंग्लज परिसरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही कमी-अधिक विरोधाची धार कायम आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरवरून ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संघर्षास आणखी धार येत आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.