पुणे : बाणेर पोलिस ठाण्यातील एका शिपायाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या खुर्चीत बसण्याचा प्रताप केलाय. एरवी हे महाशय सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्या खुर्चीत बिनदिक्कत बसतात म्हणे. असो, ते वरिष्ठांच्या काय अन् इतर अधिकार्यांच्या खुर्चीत बसले, तरी त्यांच्यावर कारवाईचे धाडस दाखवणार कोण? कारण, ते आहेत वरिष्ठांच्या खास मर्जीतले. पोलिस ठाण्यातील तक्रारीमध्ये हस्तक्षेप, गुन्हा दाखल करताना कोणती कलमे लावायची, याचा सल्लासुद्धा ठाणे अंमलदाराला ते देतात. यांना कर्तव्यावर येण्याची ना वेळ आहे, ना हजेरीचे बंधन, ना गणवेश परिधान करून रस्त्यावरील बंदोबस्ताची सक्ती. 'अहो, पोलिस महाशय! असलं वागणं बरं हाय का? जरा तरी पदाची अन् वर्दीची आब राखा, असा सल्ला पुणेकर देत आहेत.
या महाशयांची पोलिस दलात मोठी चर्चा आहे. त्यांच्याकडे पोलिस ठाण्याचे वजनदार काम सोपविण्यात आले आहे. साहजिकच या कामामुळे त्यांचा तोरा मोठा. परंतु, चक्क वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीत बसून आपणच ठाणेदार आहोत, असा आविर्भाव मिरविणे कितपत योग्य आहे? हा देखील सवाल विचारला जात आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील बाणेर हे महत्त्वाचे व मालदार पोलिस ठाणे. येथे वर्णी लागावी म्हणून पोलिस शिपायापासून ते अधिकार्यापर्यंत सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पारदर्शक बदली प्रक्रिया राबवत विशिष्ट उद्दिष्ट ठेवून बाणेरला येऊ पाहणार्यांना चाप लावला. असे असले तरी दुसरीकडे मात्र पूर्वीपासून या ठिकाणी तळ ठोकून असलेल्या या वजनदार कर्मचार्याच्या कर्तव्यनिष्ठ कामाकडे कोणाचे लक्ष का गेले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस
ठाण्याच्या विशेष कामासाठी वाहून घेतलेल्या या कर्मचार्याला कसलीच बंधने
नाहीत. मर्जीनुसार ते कामावर येतात आणि हवे तेव्हा निघून जातात. त्यांना ना
हजेरीची सक्ती, ना बंदोबस्ताचा ससेमिरा. एटीसीच्या (नक्षलवादविरोधी सेल)
नावाखाली दिवसभर ते आपली 'अर्थ'पूर्ण जबाबदारी चोख बजावतात. वरिष्ठांच्या
कामाला त्यांनी एवढे वाहून घेतले आहे की, कदाचित त्यांना पोलिस खात्याचे
मूळ कर्तव्य पार पाडण्यास वेळ मिळत नसावा!
पोलिस ठाण्यावर महाशयांचेच राज्य?
पोलिस ठाण्यात दाखल होणार्या तक्रारी, गुन्ह्याबाबत देखील हे महाशय हस्तक्षेप करतात म्हणे. एवढेच नाही, तर ठाणे अंमलदारांना कोणत्या गुन्ह्यात कोणती कलमे लावायची, हा देखील सल्ला देतात. हॉटेल, अवैध स्पा, बांधकाम, जागेचे विषय, स्थानिकांच्या वाद-विवादांच्या तक्रारी आल्या तर त्यांच्या कानावर घातल्याशिवाय कारवाई केली जात नाही. महाशयांनी वरिष्ठांच्या मर्जीत राहून निर्धारित केलेल्या नियमावलीनुसार आलेल्या तक्रारीची माहिती त्यांना दिली नाही तर ते प्रभारींच्या कानाला लागून इतर अधिकार्यांचा समाचार घेण्याससुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस ठाण्यात आणलेल्या व्यक्तींना ते बाहेरच्या बाहेर परस्पर पाठवून देत असल्याची माहिती आहे.
मोह अनेकांना सुटेना...
बाणेर पोलिस ठाण्याचा मोह अनेकांना सुटताना दिसून येत नाही. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे विभाजन होण्यापूर्वी अनेक कर्मचारी बाणेर पोलिस चौकीला काम करत होते. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली झाली. परंतु, त्यांनी परत बाणेर वाहतूक विभागात बदली करून घेतली. चौकीला पूर्वी वसुलीचे काम करणारे असे काही कर्मचारी आहेत, की जे आता बाणेर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. खुर्चीवर बसलेल्या महाशयांच्या कामात हे कर्मचारी चोख मदतीची भूमिका पार पाडतात. 'पूर्वी काम करीत असलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक विभागात कर्मचार्यांनी काम करू नये,' असे पोलिस आयुक्तांच्या सक्त सूचना आहेत. तरीदेखील अनेकांची वर्णी आधी काम केलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लावून घेतली आहे. तर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात पूर्वी वजनदार काम केलेले पोलिस कर्मचारी परत बाणेर पोलिस ठाण्यात बदलून आले आहेत. वजनदार कामावर त्यांचा डोळा आहे. वरिष्ठांनी याबाबतचा आढावा घेतला किंवा साधी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तरी ही प्रक्रिया त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागणार नाही.
महाशयांचे हॉटेल चालते पहाटेपर्यंत...
बाणेर पोलिस ठाण्याच्या समोरच 'या' महाशयांचे हॉटेल आहे. निर्धारित नियमानुसार, अधिकृत परवानाधारक खाद्यपदार्थ आस्थापनांना दीड वाजेपर्यंत परवानगी आहे, असे जरी म्हटले, तरी यांचे हॉटेल पहाटे तीन-चार वाजेपर्यंत सुरू असते. रात्री कर्तव्यावर असलेल्या अधिकार्याने आवाज दिला तर किचनमध्ये काम करणार्या आचार्यापर्यंत तो जाईल, इतके कमी अंतर हॉटेल आणि पोलिस ठाण्यात आहे. मध्ये केवळ रस्ता आहे. हद्दीतील इतर सर्व हॉटेल वेळेत बंद करण्याची खबरदारी घेणार्या पोलिसांचे या हॉटेलकडेच का दुर्लक्ष आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. पोलिस या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून अभय देत असतील तर हे नक्कीच शोभनीय नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच सर्व वसुलीवाल्यांना कामाला लावले. हे महाशय मात्र त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटल्याने अधिक बेदरकार झाले आहेत; म्हणूनच त्यांची मजल वरिष्ठांच्या खुर्चीपर्यंत गेल्याचे दिसते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.