आष्टा : येथे विहिरीत पोहायला गेलेल्या चुलता-पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. केराप्पा धोंडीराम बागडी (वय २७) व अजय पप्पान बागडी (१९, दोघेही रा. नागाव रोड, आष्टा, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत.
मोलमुजरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दोन तरुणांचा अक्षय्य तृतीया सणादिवशी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांनी हंबरडा फोडला होता. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल (ता. ३०) दुपारी २ च्या सुमारास नागाव रोडवरील वसाहतीमधील पाच ते सहा तरुण बागणी रस्त्यावरील जगन्नाथ धोंडीराम मस्के यांच्या गट नंबर १७० मधील विहिरीत पोहायला गेले होते. यामधील केराप्पा बागडी यांना पूर्णपणे पोहायला येत नव्हते. विहिरीत पोहत असताना केराप्पा बागडी बुडायला लागले आणि त्यांनी पुतण्या अजय बागडीला मिठी मारली. हे तेथील इतर तरुणांच्या लक्षात आले नाही.
बराच वेळ झाला दोघेही पाण्याच्या बाहेर येत नाहीत, म्हटल्यावर इतर तरुणांनी पाण्यात बुडून पाहिले, आरडाओरडा केला; पण वेळ निघून गेली होती. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे त्या दोघांना पाण्याचीतून बाहेर काढण्यास अडचणी येऊ लागल्यामुळे सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास पाचारण करण्यात आले. स्पेशल रेस्क्यू फोर्सने काही वेळातच दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.हे दोघेही तरुण मोलमजुरी करून चिनीमातीच्या बरण्या विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अजय बगडी याच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरी तो आणि आई दोघेच राहत होते; तर केराप्पाच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ, पत्नी लहान मुलगा व मुलगी आहेत. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंब यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.