सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभा खासदारकी येत्या २०२६ मध्ये संपुष्टात येत असताना त्यांच्या पुनरागमनाची 'चिंता' चक्क भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सतावत आहे.
माळशिरस येथील भाजप प्रवेश कार्यक्रमात पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांवर निशाणा साधताना म्हटले, शरद पवार पुन्हा राज्यसभेत कसे येतील? केवळ १० आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही. महाविकास आघाडीकडेही पुरेसे मत नाही.
सोलापूर जिल्ह्यातच पवारांचे तुतारीवाले आमदार सर्वाधिक आहेत, पण ते सातत्याने भाजपच्या संपर्कात असतात, भेटीगाठी घेतात. नेमके कुठे आहेत हे तुम्हालाच माहीत. पडळकर यांनी पवारांच्या संसदेतील सदस्यत्वाबाबत उपस्थित केलेला प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत लोकसभा आणि विधानसभेतून संसदेत प्रवेश केला, मात्र २०१९ मध्ये राज्यसभेची वाट निवडली होती. आता पक्षाच्या कमी आमदारसंख्येमुळे पुनरागमन कसे होईल, यावरून पडळकरांनी खोचक टोला लगावला.
पंढरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र
दरम्यान, पंढरपूर तालुक्यात पंचायत राज निवडणुकीसाठी महायुतीत मोठी द्रविड़प्राणायाम दिसत आहे. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील (माढा), काँग्रेसचे भगीरथ भालके, अजित पवार गटाचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे, शिंदे सेनेचे महेश साठे आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येत छुपी आघाडी केली आहे.सत्ताधारी भाजपचे आजी-माजी आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्या विरोधात महायुतीतील मित्रपक्षच एकत्र आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही एकजूट महाविकास आघाडीला बळ देणारी ठरत असून, भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.