Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- तारा वाघिणीसाठी चांदोलीच्या जंगलात तब्बल ७९ चितळ सोडले

सांगली :- तारा वाघिणीसाठी चांदोलीच्या जंगलात तब्बल ७९ चितळ सोडले


सांगली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास वाढविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून तब्बल ७९ चितळ सोडण्यात आले. गेल्याच आठवड्यात चांदोलीमध्ये तारा वाघिणीला सोडण्यात आले आहे. आणखी सात वाघ भविष्यात येथे येणार असून त्यांच्यासाठी हे चितळ खाद्य म्हणून उपयुक्त ठरणार आहेत.

यासंदर्भात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात वन्यजीव व्यवस्थापनासाठी करार झाला आहे. त्यानुसार वन्यप्राण्यांचे व्यवस्थापन, पशुवैद्यकीय मदत, वन्य प्राण्यांसोबत तेथील पाळीव पशुंचीही सुरक्षा इत्यादी बाबतीत या दोन्ही संस्था एकत्रित काम करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रात्री चांदोलीमध्ये चितळ सोडण्यात आले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, यामुळे वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे पार पडणार आहे. रेस्क्यू ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा नेहा पंचमिया यांनी सांगितले की, विविधतेने समृद्ध असणाऱ्या सह्याद्री खोऱ्यात आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येणार आहे.

वन विभागाने रेस्क्यू संस्थेच्या मदतीने गेल्या दोन दिवसांत ७९ चितळ चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडले. हे सर्व चितळ सोलापूर जिल्ह्यातून तीन ट्रकमधून आणले होते. सोलापूर जिल्ह्यात खूपच मोठ्या संख्येने चितळांचा वावर आहे. त्याशिवाय सागरेश्वर अभयारण्यासह महाराष्ट्रभरातून अतिरिक्त असणारे चितळ टप्प्याटप्प्याने चांदोलीमध्ये आणले जाणार आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी हरणे, चितळांचा शेतीला उपद्रव होत असल्याच्या तक्रारी आहेत. खाद्याच्या शोधात ती शेतात शिरून पिकांची हानी करतात. चांदोली अभयारण्यासह सह्याद्री खोऱ्यात त्यांच्यासाठी मुबलक खाद्य असल्याने ती येथे रुजतील अशी अपेक्षा आहे.
खाद्य मिळाले, तरच वाघ रमतील

दरम्यान, चंद्रपूर व ताडोबा परिसरातून आणखी सात वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहे. त्यामुळे येथील वाघांची संख्या आठवर जाणार आहे. त्याशिवाय या परिसरात पूर्वीपासून फिरणारे दोन ते तीन वाघ आहेत. नव्याने वाघ आल्यानंतर त्यांचीही पैदास वाढणार आहे. ही वाढती संख्या पाहता त्यांच्यासाठी चांदोलीत पुरेसे खाद्य आवश्यक आहे. खाद्य मिळाले, तरच वाघ चांदोलीमध्ये रमणार आहेत. हे लक्षात घेऊन येथे चितळांची संख्या वाढविण्याकडे वन विभाग लक्ष देत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.