Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये 'अग्निपरीक्षा'

पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये 'अग्निपरीक्षा'


मोदी सरकारमधील काही मंत्र्यांना आगामी वर्षात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. 2026 मध्ये किमात सहा मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून, पुन्हा संधी न मिळाल्यास त्यांना मंत्रिपद गमवावे लागू शकते. निवडणुकांच्या दृष्टीनेही 2026 महत्त्वाचे असून, पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आणि राज्यसभेच्या तब्बल 75 जागांवर निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

कोणत्या मंत्र्यांचा कार्यकाळ संपतोय?
रामदास आठवले (आरपीआय - ए, भाजप समर्थित)

रामनाथ ठाकूर (जेडीयू)

जॉर्ज कुरियन (भाजप)

रवनीत सिंह बिट्टू (भाजप)

हरदीप सिंह पुरी (भाजप)

बी. एल. वर्मा (भाजप)

यापैकी चार मंत्री भाजपचे, एक जेडीयूचा आणि एक भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. संबंधित पक्षांनी पुन्हा राज्यसभेवर न पाठवल्यास, कॅबिनेटमधून त्यांची गच्छंती निश्चित मानली जाते.
कधी संपतो कार्यकाळ?

रामदास आठवले-2 एप्रिल 2026

रामनाथ ठाकूर-9 एप्रिल 2026

जॉर्ज कुरियन, रवनीत सिंह बिट्टू -21 जून 2026

हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मा- नोव्हेंबर 2026

महाराष्ट्र: आठवले यांना तिसरी संधी?

एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांचाही कार्यकाळ याच वेळी संपतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपची स्थिती भक्कम असल्याने चार जागा भाजप, तर एक-एक जागा शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकू शकते. विरोधक एकत्र आले तर एक जागा त्यांच्या वाट्याला जाऊ शकते.

भाजपने यापूर्वी रामदास आठवले यांना दोनदा राज्यसभेत पाठवले आहे. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा न मिळाल्याने, भाजप तिसरी संधी देईल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. संधी न मिळाल्यास 2026 मध्ये त्यांना मंत्रिपद सोडावे लागू शकते.

बिट्टू आणि कुरियन यांचे भवितव्य?
रवनीत सिंह बिट्टू 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यानंतर राजस्थानमधील रिक्त झालेल्या जागेवरून त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. आता जून 2026 मध्ये राजस्थानातील तीन जागा रिक्त होत असून, दोन भाजप आणि एक काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. भाजप बिट्टूंना पुन्हा संधी देईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जॉर्ज कुरियन हे मध्य प्रदेशातून राज्यसभा सदस्य आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ते निवडून आले होते. भाजपने 2026 मध्ये पुन्हा राज्यसभेत पाठवले, तरच त्यांचे मंत्रिपद टिकेल.
रामनाथ ठाकूर यांना नितीशकडून संधी?

एप्रिल 2026 मध्ये बिहारमधील पाच राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. यामध्ये जेडीयूचे हरिवंश नारायण सिंह (उपसभापती) आणि केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांचाही समावेश आहे. नितीश कुमार यांनी दोघांनाही आतापर्यंत दोन कार्यकाळ दिले आहेत. भाजप-जेडीयू आघाडीला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता असून, एक जागा विरोधकांकडे जाऊ शकते. कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र असलेले रामनाथ ठाकूर यांना जेडीयू तिसरी संधी देणार का, यावर त्यांच्या मंत्रिपदाचे भवितव्य अवलंबून आहे.

उत्तर प्रदेश: पुरी विरुद्ध वर्मा?
हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा हे दोघेही उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य आहेत. नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपतो. यूपीतील 10 राज्यसभा जागा यावेळी रिक्त होत असून, भाजपकडे आठ जागा जिंकण्याइतकी संख्या आहे, तर सपा आणि बसपाला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. अशा परिस्थितीत पुरी आणि वर्मा यांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळते आणि कोणाची मंत्रिपदाची खुर्ची जाते, हे 2026 च्या राजकीय समीकरणांवर ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.