Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे": नाना पटोले

"निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे": नाना पटोले


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ दिसून येत आहे आणि मतदारांमध्ये मनस्ताप निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. अशा निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणलाच पाहिजे. निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. सरकार महाभियोग आणणार नसेल तर निवडणूक आयोगाच्या मागे तुम्हीच आहात असे म्हणायला वाव आहे, या शब्दांत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला. 

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोग दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. लोकशाहीचा खून केला जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये चिड निर्माण झाली आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्याचे प्रस्ताव ठेवत आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असल्याने आता त्यांनी महाभियोग आणावा, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.


निवडणूक आयुक्तांवर महाअभियोग आणला पाहिजे
आम्ही पण निवडणूक आयोगाची अशा प्रकारची प्रक्रिया पहिल्यांदाच पाहत आहोत. जनतेमध्ये प्रचंड चिड आहे. अशा स्थितीत निवडणूक आयोगाला हाताशी धरून सरकारच असे घडवून आणत आहे का असाही संशय अनेकांना निर्माण झाला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. मुख्यमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यघटनेच्या कलम २४३ प्रमाणे निवडणूक आयुक्तांवर महाअभियोग आणला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान, राज्यभरात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मतदान झाले तरी त्याची मतमोजणी २१ तारखेला केली जाणार आहे. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, लगेचच निकाल अपेक्षित असताना मतमोजणी पुढे ढकलली, त्यामुळे सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. लगेचच जर निकाल आले असते तर महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष झाला असता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.