सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या भालवणी गावात एका फटाका (आतिशबाजी) निर्मिती कारखान्यात भीषण आणि शक्तिशाली स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज आणि धक्का सुमारे दोन किलोमीटरपर्यंत जाणवला, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांचे उत्पादन सुरू असतानाच अचानक हा स्फोट झाला. स्फोटामुळे भालवणीसह आसपासच्या गावांतील अनेक घरांच्या आणि वाहनांच्या काचा तडकल्या, तर जमिनीला देखील जोरदार हादरे बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या स्फोटात आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.स्फोटानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांच्या मदतीने बराच वेळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.आग विझवण्यात आली असली तरी या भीषण स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने परिसराला तातडीने घेराव घातला असून, घटनेची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. हा कारखाना नियमांनुसार चालत होता का आणि सुरक्षेच्या उपाययोजना पाळल्या जात होत्या का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.