राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांना त्यांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय पवारांनी मुखाग्नी दिला. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न दबक्या आवाजात चर्चेत असतानाच आता अजित पवारांचा उत्ताराधिकारी म्हणून एक नाव पुढे येत असल्याचं अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याने म्हटलं आहे. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातून बाहेर पडतानाच पक्षाचं नेतृत्व कोणाकडे द्यावं याबद्दल या नेत्याने भाष्य केलं आहे.
बुधवारी झाला अपघात
बारामती विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर 500 मीटर उंचीवरुन अजित पवारांचं विमान कोसळून भीषण आग लागली. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत विमानातील क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सहकारी अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आज लाखो लोकांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये भावपूर्ण वातावरणात शेवटचा निरोप देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्र्यांपासून मुख्यमंत्री आणि राज्यातील नेत्यांपासून ते लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. अजित पवारांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियापासून ते अगदी गप्पांमध्येही अजित पवारांनंतर पक्षाचं भवितव्य काय असेल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यासारख्या प्रश्नांची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसतेय.
'या' व्यक्तीला उत्तराधिकारी करण्याची मागणी
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झीरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना उत्तराधिकाऱ्याबद्दल विधान केलं आहे. "अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात," असं झीरवाळ यांनी म्हटलं आहे. "राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे," असं नरहरी झीरवाळ म्हणाले आहेत. "आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच," असल्याचंही झीरवाळ म्हणालेत. "आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथुन पुढे एकत्रच असणार यात शंका नाही," असंही झीरवाळ यांनी नमूद केलं आहे.
सर्वसामान्य जनतेकडून होतेय विनंती
"सगळे बारामतीकर म्हणतीलच म्हणतील पण महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात की वहिनींना आता सत्तेत आणलं पाहिजे. सर्वसामान्य जनतेकडून होतेय विनंती तशी आमची विनंती आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीलाच एकत्र आले होते. काही ठिकाणी टोकाचा विरोध झाला होता पण आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही," असंही नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.