उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्य हादरले आहे.बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या या पॉवरफुल नेत्याकडे नेमकी किती संपत्ती होती, याबाबतची माहिती समोर येत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 124 कोटी रुपयांच्या आसपास होती.
एका अनुभवी आणि प्रशासनावर पकड असलेल्या नेत्याची ही संपत्ती नेमकी कोणत्या स्वरूपात होती, हे पाहूया अजित पवार यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता अजित पवार यांनी 2024 च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अर्ज भरताना आपल्या मालमत्तेचे तपशील दिले होते. त्यानुसार त्यांच्याकडे 8.22 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. यामध्ये त्यांच्याकडील वाहने, बँक ठेवी आणि विविध गुंतवणुकींचा समावेश होता. त्यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य 37.15 कोटी रुपये इतके स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडे टोयोटा कॅमरी आणि होंडा सीआरव्ही या दोन महागड्या वाहनांशिवाय एक स्वतःचा ट्रॅक्टरदेखील होता.
बँक खात्यातील रक्कम आणि गुंतवणूक
प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांच्या विविध बँक खात्यांमध्ये 6.81 कोटी रुपये जमा होते. रोख रकमेचा विचार केला तर त्यांच्याकडे 14.12 लाख रुपये कॅश स्वरूपात होते. आर्थिक नियोजनाच्या बाबतीतही ते सतर्क होते, त्यांनी विविध कंपन्यांचे शेअर्स, बॉण्ड्स आणि डिबेंचर्समध्ये 55 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. याशिवाय त्यांच्या नावे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची एलआयसी पॉलिसी होती. त्यांच्याकडे काही चांदीच्या वस्तू असल्याचा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात केला होता.
पत्नी सुनेत्रा पवार यांची संपत्ती
अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचीही स्वतःची मोठी मालमत्ता आहे. त्यांच्या नावे 14.57 कोटी रुपयांची जंगम तर 58.39 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. सुनेत्रा पवार यांच्याकडे 44 लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी होती. दोघांची एकत्रित संपत्ती पाहता पवार कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम होते.
राजकारणातील दबदबा आणि अखेरचा प्रवास
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे ते राज्यातील एकमेव नेते ठरले. प्रशासकीय कामाचा उरका आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख होती. बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीला एका जाहीर सभेसाठी जात असताना, त्यांच्या विमानाला लँडिंगच्या वेळी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सुरक्षारक्षक आणि वैमानिकांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक कार्यक्षम प्रशासक गमावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.