मुख्यमंत्र्यांच्या दालनात तर आहेच, पण प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात
धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार; 100 टक्के मंत्री भ्रष्टाचारात अखंड
बुडालेत; संजय राऊतांचा 'क्लीन चिट'वरून हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय दालनातील भ्रष्टाचारावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लिन चिट दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयातील प्रत्येक मंत्रालयाच्या दालन्यात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे, अशी टीका राऊत यांनी केली. जवळजवळ 100 टक्के मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडाले आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
तोपर्यंत त्यांच्या दालनामध्ये घुसणार नाहीत
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं (एसीबी) जरी लक्ष असलं, तरी जोपर्यंत मुख्यमंत्री इशारा करत नाही तोपर्यंत त्यांच्या दालनामध्ये घुसणार नाहीत. भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या असं धोरण फडणवीस यांचं असून भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. तो झिरवाळ बिचारा गरीब आदिवासी, त्याला नीट प्लॅनिंग करणं जमलं नाही. त्या आदिवासीचा बळी दिला मुख्यमंत्र्यांनी, पण जवळजवळ 100 टक्के मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडाले आहेत, असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची उमेदवारी आणि रणनीती
दरम्यान, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवर बोलताना राऊत म्हणाले, आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे हे ठरवू. उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ती कायम राहील. आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल. हा काय मोदींचा पक्ष आहे का? मोदींच्या पक्षामध्ये मतप्रदर्शन व्यक्त करायला बंदी आहे तिथे लोकशाही नाही. आमच्याकडे तीन स्वतंत्र पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये लोकशाहीचा मान राखला जातो, असे ते म्हणाले.
'एक आचारी रस्सा भिकारी'
एकनाथ
शिंदे यांच्या 'एक अनार सौ बिमार' या विधानावर राऊत म्हणाले, एक आचारी
रस्सा भिकारी, उपमुख्यमंत्र्यांनी मराठी विषयी अभ्यास करावा, वाचन करावं.
मग त्यांना इतर काही चांगले वाक्प्रचार मराठीत सुचतील. 'एक अनार सौ बिमार'
सारखे अमराठी वाक्प्रचार त्यांना वापरावे लागणार नाही.
विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर हल्लाबोल
विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन चालवलं जाणं ही लोकशाहीची विटंबना आहे. हा कसला अहंकार? असा अहंकार दुर्योधनाला होता. दुर्योधन अहंकाराने म्हणाला होता, सुईच्या अग्राएवढी जमीन मी तुम्हाला देणार नाही. त्या अहंकारातून दुर्योधन आणि कौरवांचा विनाश झाला, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट वागत असल्याची टीक त्यांनी केली. त्यांना विरोधी पक्ष नेता यासाठी नको आहे कारण त्यांची सगळी लक्तरं बाहेर काढणारा एक घटनात्मक पदावर बसलेला माणूस विधानसभेत येईल आणि त्याचे ऐकावे लागेल, असा आरोप राऊत यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.