Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

5 नेत्यांना आमदारकीची 'लॉटरी' लागणार : झेडपी-मनपा गाजवणाऱ्यांची नावे आघाडीवर; कोणाचं नशीब उघडणार?

5 नेत्यांना आमदारकीची 'लॉटरी' लागणार : झेडपी-मनपा गाजवणाऱ्यांची नावे आघाडीवर; कोणाचं नशीब उघडणार?


राज्यात राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आला आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त कोट्यातील 5 जागांबाबत हालचाली तीव्र झाल्या असून बराच काळ प्रलंबित असलेल्या या नियुक्त्यांवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इच्छुकांनी विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 'फिल्डिंग' लावायला आतापासूनच सुरुवात केली आहे.

राज्यपाल नियुक्त या पाच जागांसाठी सहसा कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, सहकार अशा क्षेत्रातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींमधून केली जाते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावणारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामगिरी सिद्ध केलेले चेहऱ्यांना यावेळी संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे समीकरणांमुळे अनुभवी राजकीय नेत्यांनाही संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

विधानपरिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 आहे. सध्या 55 सदस्य कार्यरत असून 23 जागा रिक्त आहेत. यापैकी 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत सभागृहाचे गणित बदलण्याची चिन्हे आहेत. विधानसभेतील 286 आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे एका जागेसाठी सुमारे 36 मतांचा कोटा लागू शकतो, असा अंदाज आहे.

विधानपरिषद हे राज्याचे वरचे सभागृह मानले जाते. हे सभागृह कायमस्वरूपी असून विधानसभेसारखे दर 5 वर्षांनी बरखास्त होत नाही. त्याची रचना विविध घटकांमधून होते.

कशी असते विधानपरिषदेची रचना?

30 सदस्यांची निवड आमदारांकडून केली जाते.

22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून येतात.

7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून,

तर 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात.

उर्वरित 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

अशा प्रकारे 78 सदस्यांचे हे सभागृह तयार होते.

दरम्यान, केवळ विधानपरिषदच नव्हे तर राज्यसभेच्या पातळीवरही मोठे बदल अपेक्षित आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिल 2026 रोजी रिक्त होणार आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेत 5 राज्यपाल नियुक्त जागा, त्यानंतर मे महिन्यात संपणाऱ्या 9 जागा आणि पुढे राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत असल्याने येत्या काळात राजकीय रस्सीखेच वाढणार हे स्पष्ट आहे.

राज्यसभेतून 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होणाऱ्यांमध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. या सर्व जागांमुळे राज्यातील प्रमुख पक्षांसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहणार आहे.

एकूणच पाहता, विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन्ही पातळ्यांवरील रिक्त जागांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी आपापली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात काय उलथापालथ होऊ शकते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.