Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- 'ती' ने नाकारले पहिले मतदान.. माधवनगरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

सांगली :-'ती' ने नाकारले पहिले मतदान.. माधवनगरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
 

सांगली: लोकशाहीचा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना अनेक नवमतदारांनी बोटावर लागलेली शाई दाखवत आनंद व्यक्त केला. सोशल मिडीयावर देखील अनेक नवमतदारांनी फोटो 'व्हायरल' केले. एकीकडे हा उत्सव व्यक्त होत असताना मिरज तालुक्यातील माधवनगर येथील नेहा ढाले या युवतीने परिसरातील मतदारांबरोबर बहिष्कारामध्ये सामील होत, पहिले मत नाकारत असल्याचे जाहीर करत बोटावर बहिष्काराची शाई लावली.

बुधगाव जिल्हा परिषद गटातील माधवनगर गावातील अष्टविनायकनगरमधील जवळपास ३०० हून अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाला माहिती मिळता अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह अष्टविनायकनगर येथे शुक्रवारी सायंकाळी भेट दिली. तेव्हा नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. अधिकाऱ्यांनी येथील विकास कामे मंजूर असून तत्काळ सुरू होतील अशी ग्वाही दिली. परंतू नागरिकांनी दोन वर्षापासून मंजूर असलेली कामे अद्याप अपूर्णच असल्याचे सांगत मतदानावर बहिष्कार कायम असल्याचे जाहीर केले. शनिवारी मतदानाच्या दिवशी सकाळपासून अष्टविनायकनगरमध्ये निवडणुकीचे वातावरण दिसून येत नव्हते. एका चौकात संतप्त महिला माध्यम प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच घोळक्यात उभ्या असलेल्या नेहा ढाले या युवतीने देखील सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, 'पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता. परंतू भारतात जेव्हापासून संविधान लागू झाले, तेव्हापासून राजा हा मताच्या पेटीतून जन्म घेऊ लागला आहे. आज माझे पहिले मतदान होते. परंतू मी मतदान करणार नाही. कारण आमच्या भागातील मुलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. रस्ते, गटारी, पाणी आदी समस्या कायम असल्यामुळे लोकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे माझा देखील मतदानावर बहिष्कार आहे.'
१५ वर्षापासून सुविधांचा बोजवारा

शनिवारी मतदानाच्या दिवशीही काहींनी येथे येऊन मतदारांना विनंती केली. परंतू अपवाद वगळता मतदार बाहेरच पडले नाहीत. एका गल्लीत जमलेल्या संतप्त महिलांनी गाऱ्हाणे मांडले. परिसरात गटारी नाहीत. रस्ते नाहीत. ड्रेनेजची कामे खोळंबली आहेत. पाणी आठ दिवसातून एकदा ते दूषित पाणी येते. कचरा उठाव वेळेवर होत नाही. गेल्या १० ते १५ वर्षापासून समस्या कायम आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी भरूनही सुविधा मिळत नाही. आम्हाला राजकारण नको असून सुविधांसाठीच आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.