मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित या अर्थसंकल्पात प्रत्येक स्तंभात चार उपक्षेत्रे असून एकूण १६ उपक्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना
राज्यातील २९ महापालिका, २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
नागपुरात ‘महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था’
AIIMS आणि IIM च्या धर्तीवर उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि संशोधनासाठी नागपूर येथे ‘महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था’ स्थापन केली जाणार आहे. भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था यासाठी सहकार्य करणार आहे.
ग्रामीण भागासाठी ४,५०० कोटींची प्रगती योजना
कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचे ग्रामीण भागात वेळेत निदान व्हावे, यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने ४,५०० कोटी रुपयांची प्रगती योजना राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान –
राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येणार आहे. रिअल-टाइम डॅशबोर्डच्या माध्यमातून आरोग्य सेवांचे प्रभावी नियोजन आणि देखरेख करणे शक्य होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांचा विस्तार –
राज्यात सध्या ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून ११ नवीन महाविद्यालयांची कामे विविध टप्प्यांवर सुरू आहेत.
महात्मा फुले जनारोग्य योजनेचा विस्तार –
महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ वर नेण्यात येणार आहे. तसेच या योजनेत सहभागी रुग्णालयांची संख्या १,७९२ वरून ४,५३७ पर्यंत वाढविण्यात येईल. नऊ प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण उपचारांसाठी आता २२ लाख रुपयांपर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अंबाजोगाई, बीड आणि सातारासाठी विशेष तरतुदी –
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथील इमारतींच्या एकत्रीकरणासाठी सर्वंकष आराखडा तयार केला जाणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारासाठी ३६० खाटांचे नवीन रुग्णालय, नर्सिंग कॉलेज आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव आहे. सातारा जिल्ह्यातील दरे येथे निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार असून ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांवर या केंद्रात भर दिला जाणार आहे.
मुंबईत जागतिक दर्जाचे वेलनेस केंद्र –
मुंबई महानगर परिसरात सर्वांगीण आरोग्य आणि वेलनेससाठी जागतिक दर्जाचे केंद्र उभारण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
