ईश्वरपूर : भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मिरगाव शिवारात उभारलेल्या शिवनिका संस्थान ट्रस्टला ३९ लाख लीटर पाणी देण्याचा निर्णय शासनाच्या उपसमितीने घेतला होता. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्रस्टला पाणी दिल्याचा दावा राजकीय स्तरावरून त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे. आमदार जयंत पाटील आणि अशोक खरात यांचे एकत्र छायाचित्र पुढे आणत त्यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेले शिवनिका संस्था ट्रस्ट अशोक खरात यांच्या कारनाम्यात चर्चेत आली आहे. या मंदिराला अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली आहे. या ट्रस्टवर मातब्बर लोकांची वर्णी लावली आहे. तेव्हापासून खरात चर्चेत आला आहे.राष्ट्रवादी पक्षाची राज्यात संवाद यात्रा २०२१ मध्ये काढण्यात आली होती. या यात्रेत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर एकत्रित होते. याचवेळी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यात जयंत पाटील यांनी यात्रेदरम्यान विविध ठिकाणी देवस्थानांना भेटी दिल्या होत्या. यातूनच अशोक खरात यांची भेट घेतली होती. या ट्रस्टला पाण्याची गरज होती. त्यासाठी ट्रस्टने २०१९ मध्ये कार्यकारी अभियंता गोदावरी संस्था यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यावेळी जयंत पाटील जलसंपदा मंत्री नव्हते.
२०२० मध्ये कार्यकारी अभियंत्याकडून मागणीचा प्रस्ताव शासनाच्या उपसमितीकडे आला. यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळाच्या उपसमितीने विविध देवस्थानांना पाणी दिले आहे. त्याला अनुसरूनच या देवस्थानाला जलसंपदा विभागाने फक्त पिण्यासाठी म्हणून पाणी दिले आहे. हाच धागा पकडून विरोधकांनी आमदार जयंत पाटील आणि भोंदू खरात यांचे एकत्रित छायाचित्र व्हायरल केल्याने यावरून राजकीय चर्चा रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.