Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'...म्हणून अशोक खरातचा 'या' तारखेला एन्काऊंटर होऊ शकतो!' महिला नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ

'...म्हणून अशोक खरातचा 'या' तारखेला एन्काऊंटर होऊ शकतो!' महिला नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ


नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ व ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. विरोधकांनी खरात प्रकरणात राजकीय आरोपांची धार टोकदार केल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची पहिली विकेट पडली. आता या प्रकरणात अनेक मंत्री व बड्या नेत्यांच्या 'कनेक्शन' समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अशोक खरात एन्काऊंटर केला जाऊ शकतो असा धक्कादायक दावा राजकीय वर्तुळातून समोर आला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर दुसर्‍याच दिवशी 'कॅप्टन'व अंकशास्त्रज्ञ अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो असा राजकीय वर्तुळात हादरवणारा दावा केला आहे. इतकंच नाही,तर त्यांनी या एन्काऊंटरची तारीखही सांगितली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, अनेक मंत्री आणि बड्या राजकारण्यांची महत्त्वाची माहिती ज्योतिषी खरातकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बड्या अनेक राजकीय नेत्यांची पायाखालची वाळू सरकली असून त्यांची प्रकरणं दडपण्यासाठी खरातला कायमचं संपवण्याचा कट रचला जात असल्याचा संशय काही पीडितांनी व्यक्त केल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे.
अशोक खरातचा 24 मार्च रोजी एन्काऊंटर केला जाण्याची दाट शक्यता असल्याचा दावा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी करतानाच खरातच्या एन्काऊंटरच्या कटात अनेक मोठे हात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालत खरातच्या एन्काऊंटरचा हा डाव हाणून पाडावा असंही देसाई म्हणाल्या. या प्रकरणात माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी कॅप्टन खरातनं ज्या प्रकारे लोकांचे शोषण केलं आहे, त्याचे धागेदोरे खूप खोलवर आहेत. राहाता तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित लोक या भामट्याचे शिकार झाले आहेत, मात्र, बदनामीच्या भीतीने अनेकजण समोर यायला घाबरत आहेत,असं म्हटलं होतं.

याचदरम्यान, सुजय विखे पाटील यांनी मात्र, माझा अशोक खरातशी कधीही संबंध आलेला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.तसेच यावेळी त्यांनी आपण खरातला कधीही भेटलो नसून त्याच्याशी माझं कधी बोलणं न झाल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून यात लवकरच सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि पाद्यपूजन करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार हल्ले चढवण्यात आले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाल्यानंतर चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
यानंतरही रुपाली चाकणकर यांच्या पाठीमागच्या अडचणी कमी होणार नसल्याचं दिसून येत आहे. कारण महिला आयोगाच्या राजीनाम्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुनही हटवले जावे अशी मागणी केली जात आहे.त्यामुळे खरात कनेक्शन चाकणकरांना चांगलंच भोवल्याचं दिसून येत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.