Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहिल्यांदाच मार्चमध्ये भरणार पहिलीचा वर्ग; महाराष्ट्रात शिक्षणाचा अनोखा प्रयोग

पहिल्यांदाच मार्चमध्ये भरणार पहिलीचा वर्ग; महाराष्ट्रात शिक्षणाचा अनोखा प्रयोग
 

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील दोन हजार जिल्हा परिषद शाळांमधील पहिलीचा वर्ग यंदा मार्चमध्येच भरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी, शाळेचा लळा लागण्यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामध्ये शाळांचे इयत्ता पहिलेचे पूर्वतयारीचे वर्ग ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे नियोजन केले आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी विविध उपक्रम राबविते. मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी एप्रिल, जूनमध्ये मेळावे घेण्यात येतात. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. यंदा आता शिक्षण विभाग मार्चमध्येच पहिलीचे वर्ग घेण्याचे नियोजन करत आहे.
 
नवीन शैक्षणिक वर्षात दरवर्षी जून महिन्यात इयत्ता पहिलीचा वर्ग भरतो. सुरुवातीला शाळेत येताना अनेक विद्यार्थी रडतात, त्यात काही विद्यार्थी गैरहजर राहतात. अशावेळी आनंददायी शिक्षणाचे वातावरण तयार करण्याच्या हेतूने, विद्यार्थ्यांला शाळेची, अभ्यासाची गोडी लागावी, शाळेत बसण्याची सवय लागावी यासाठी शिक्षण विभागाचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. मार्च ते एप्रिल दरम्यान वर्ग घेऊन आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ओळख, पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २०९० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये हे वर्ग सुरू होतील, असे शिक्षण विभागाच्या अधिकारी सूत्रांनी सांगितले.

९ मार्चपासून वर्ग

९ मार्चपासून पहिलीचा वर्ग भरणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरू राहतील. त्यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जूनमध्ये पुन्हा नियमित वर्ग सुरू होतील. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या पहिली ते दहावीपर्यंत सुमारे २ लाख २० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीला १६ ते १७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात.

उपस्थितीचे प्रमाण वाढेल..!
प्रवेश प्रक्रियेत मे महिन्यापासूनच शिक्षकांकडून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यानंतर शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जातो. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची गावोगावी बैलगाडीमधून मिरवणूक काढणे, शाळेमध्ये फुले देऊन त्यांचे स्वागत करणे, त्यांना खाऊ देणे यासारखे उपक्रम राबविले जातात. पहिलीच्या मुलांना शाळेत जास्त वेळ बसण्याची सवय नसते, त्यामुळे ते रडतात. परिणामी, सुरूवातीचा महिनाभर मुलांची उपस्थिती नियमित राहत नाही. ही बाब विचारात घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे उपस्थितीचे प्रमाणही वाढेल, असे सांगण्यात येते. 
 
लहान मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी, या हेतुने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिलीचा वर्ग जूनऐवजी मार्चपासूनच भरविण्यात येईल. ९ मार्चपासून शाळांमध्ये पहिलीचा वर्ग भरविला जाणार आहे. मार्चच्या पहिल्या तारखेपासूनच पहिल्याच वर्गातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत आणले जाणार आहे. शिक्षकांना त्याबाबत लवकरच प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

- जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

-

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.