Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदारांनो सावधान! सभागृहात तुमचं खासगी बोलणंही रेकॉर्ड होतंय?

आमदारांनो सावधान! सभागृहात तुमचं खासगी बोलणंही रेकॉर्ड होतंय?
 

नाशिक :  राजकारणात आश्वासन आणि आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात. यासह चोवीस तास लोकांच्या कामासाठी उपलब्ध असले पाहिजे. वरिष्ठ नेत्यांना त्रास न देता सातत्याने कार्यरत असता, तेव्हांच आशीर्वाद मिळतो. चांगले संबंध राखण्यासाठी आश्वासने द्यावी लागतात. आपण सर्वांशी चांगली वागणूक ठेवली तर दोन दशके राजकारण करता येते, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विधीमंडळातील काही गुपितेही उघड करताना सदस्य अर्थात आमदारांवर किती बारीक नजर असते, याकडे लक्ष वेधले.

येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणातील कुसुमाग्रज नगरीत चौथ्या विश्व मराठी संमेलनातंर्गत रविवारी ‘मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग’ हा परिसंवाद झाला. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या परिसंवादात राजकारणात यशस्वी होण्यासाठी काय महत्वाचे ठरते इथपासून ते विधीमंडळातील गोंधळ, युवा पिढी मराठी भाषेचे आव्हान कसे पेलणार, स्त्री-पुरूष समानता, कुटुंबातील लोकशाही अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी विधी मंडळातील काही गुपितेही गोऱ्हे यानी कथन केली. विधीमंडळात महत्वाच्या प्रश्नांवर बोलायला मिळावे, ही सदस्यांची अपेक्षा असते.
चर्चा करायची असते. एखाद्या प्रकरणात त्यांना मंत्र्यांवर आरोप करायचे असतात. परंतु, मंत्र्यांवर आरोप करण्याआधी त्यांनी नोटीस देणे बंधनकारक असते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग कित्येक तास बंद हा विषय तारांकित प्रश्न व्हावा, असे त्यांना अपेक्षित असते. परंतु, तारांकित प्रश्न होण्याची मुदत निघून गेलेली असते. सभागृहात विरोधी पक्ष स्वत:चा धर्म पाळत असतो. सत्ताधारी पक्ष त्यांची रणनीती आखत असतो. बुद्धिबळाच्या पटलाप्रमाणे दोन प्रकारे व्यूहरचना असते. आम्हाला सकाळीच विरोधी पक्ष किती वेळ गोंधळ घालणार, किती वेळा सभात्याग करणार, हे माहिती असते, असे गोऱ्हे यांनी नमूद केले.

एखाद्यावेळी विरोधी पक्ष वा कोणाकडून अपशब्द वापरला जातो. तेव्हा सत्ताधारी पक्षाला कठोर भूमिका घेणे भाग असते. संबंधितांचे निलंबन केले जाते. खासगीत ते सदस्य दिलगिरी व्यक्त करतात. मग निलंबनाचा कालावधी कमी केला जातो. विधीमंडळ चर्चेसाठी आहे. दुर्देवाने लोकसभेत तसे दिसत नाही. सर्वांना बोलण्याची संधी मिळणे आवश्यक असते. सभागृहाची रचना अशी आहे की, समोरील बाकांवर बसलेले आमदार एकमेकांशी काय बोलतात, हे देखील आम्हाला पूर्ण ऐकू येते. ताई, काही बोलायला देणार नाहीत, असे कानी पडल्यावरच आम्ही बोलायला संधी देतो.
काही वेगळ्या पद्धतीने बोलत असतात. अंगविक्षेपामुळे निलंबन झाल्याचा दाखला गोऱ्हे यांनी दिला. सभागृहात आमची बारीक नजर असते. सदस्यांना आपण एकमेकांंशी काय बोलतोय ते सभापती वा उपसभापतींना ऐकू जाईल हे माहीत नसते, हे गुपितही त्यांनी उघड केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. सभागृहात शेतकरी प्रश्नावर दिवसभर चर्चा झाली तरी त्याबाबत दोन ओळी छापून येत नाही. परंतु, सभागृहाच्या पायऱ्यांवर एखाद्याने शीर्षासन केल्यास इंग्रजी दैनिकाच्या पहिल्या पानावर छायाचित्र प्रसिद्ध होते, याकडे गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.